म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले
'१० डिसेंबरपर्यंत किणी टोलनाक्याने दहा व वीस किलोमीटर अंतरावरील व त्रिज्येतील गावांतील वाहनांना टोलची सवलत दिली नाहीतर हा टोलनाका वारणा नदीत विसर्जित करू,' असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.
पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील नगरपालिका चौकात शहर शिवसेनेच्या वतीने सरकारच्या आदेशानुसार किणी टोल नाक्यापासून दहा व २० कि.मी.च्या त्रिज्येत असलेल्या गावांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले. जोपर्यंत टोल प्रशासन आंदोलनस्थळी येऊन सवलत देण्याची घोषणा करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली. टोल प्रशासनास आंदोलनस्थळी बोलाविण्यात आल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावरून उठून उपोषणस्थळी गेले. यावेळी पेठवडगाव व किणी परिसरातील ग्रामपंचायतींनी ठरावाची पत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील यांना दिली.