म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पारधी समाजावर अनेक वर्षांपासून गुन्हेगार असल्याचा शिक्का मारला गेला होता. आता मात्र याच समाजातील तरुणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावरील हा शिक्का तर पुसला गेला आहे. ज्यांच्या मागावर पोलिस सातत्याने असतात त्या पारधी समाजातील तरुणांना राज्यातील तीन ठिकाणी एक दिवस पोलिस अधिकारी बनण्याची संधी मिळाली आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमातंर्गत ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी आदिवासी पारधी समाजाच्या जयश्री काळे या तरुणीला देण्यात आली.
जय़श्री सांगते, पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी पोलिसांनीही भरीव प्रयत्न केले. या दिवशी पोलिस स्टेशनला येणाऱ्या सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न समजून घेता आले, त्यांना येथे आल्यानंतर कोणत्या अडचणी येतात कशा प्रकारची वागणूक मिळते हेसुद्धा लक्षात आले. समाजातील तरुणांना आता व्यवस्थेमध्ये बदल हवा आहे. शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी विविध माध्यमांतून प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवायला हवेत, असे जयश्री यांनी सांगितले.
पोलिसांनीच समाजातील या तरुणांचा स्वीकार केला आहे, असा संदेश जेव्हा जाईल तेव्हा इतरांकडून होणारा त्रासही कमी होईल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिस स्टेशनची प्रक्रिया समजून घेण्यासाठी पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून तीन तास काम करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोक अधिकार आंदोलनाच्या महिला संघटिका जयश्री काळे यांना ठाणे अंमलदार पदभार देण्यात आला. भटके-विमुक्त,आदिवासी पारधी भिल्ल समाजातील महिलांच्या कौटुंबिक हिंसाचार, भेदभाव, बालविवाह, अंधश्रद्धा या मुद्द्यावर काम करतात. त्या सांगतात पोलिस अधिकारी म्हणून तीन तास काम करताना सर्वसामान्यांच्या तक्रारीचे २२ फोन घेतले. स्टेशन डायरीला चार नोंदी केल्या. एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवली व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया समजून घेतली.
अशीच संधी विशाल पवार या पारधी तरुणाला मिळाली आहे, जामखेड पोलिस स्टेशनचा एक दिवसाचा ठाणे अंमलदार म्हणून त्यानेही काम पाहिले. यावेळी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, अनिल भारती, रेवन्नाथ दहिफळे, रघुनाथ खेडकर, यांनी त्यांना पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज कसे चालते हे समजावून सांगितले. विशाल सांगतो, गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे काम मी सातत्याने करत होतो. पारधी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणताना त्यांच्या मनातील पोलिसी खाक्याबद्दलची भीती घालवून देण्याचे काम आता अधिक सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशालचे काम पाहून जामखेड पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी विशालला एक दिवसाचा पोलिस अधिकारी पदावरची जबाबदारी देऊन विश्वास दाखवला आहे.