म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई धर्मवीर आनंद दिघे उद्यान सेक्टर-१८ नेरूळ येथे बसविण्यात आलेल्या स्प्रिंकलरच्या दुरवस्थेबाबत तसेच सुरक्षारक्षक नसल्याबाबत नागरिकांकडून पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र असे असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने उद्यानातील झाडे-पाने सुकू नये, म्हणून स्प्रिंकलर बसविले. हे स्प्रिंकलर उद्यानाच्या उद्घाटन दिवशी बसविण्यात आले. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. यानंतर दोन- तीन महिने झाडांना पाणी मिळाले. सद्यस्थितीत हे स्प्रिंकलर बंद आहे. काही स्प्रिंकलर उद्यानातील जमिनीवर आलेले दिसत आहे. त्यामुळे लहान मुले खेळतान पडतात. त्यांना दुखापत होते. महानगरपालिके मोठा गाजावाजा करत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र लगेचच त्याची दुरवस्था झाली. उद्यानात बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही, त्यामुळे पाण्यात अळ्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे महानगरपालिका अशुद्ध पाणी आढळल्यास दंड आकारत आहे व दुसरीकडे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचप्रकारे उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ व महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केली.
नेरूळमधील उद्यानाची दुरवस्था
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2020, 4:00 am