म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
हिंदू मुलाशी विवाह केल्याबद्दल मुस्लिम मुलीच्या कुटुंबीयांकडून त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले जात असल्याच्या आरोपांची शहानिशा करून त्यांना पोलिस संरक्षण देण्याचा दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही उच्च न्यायालयात देऊनही प्रत्यक्षात पोलिसांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्या मुलीने आता दोघांच्या वतीने पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
'लहानपणापासून प्रेम असल्याने उजमा मुराद कालू (२१) हिने दशरथ कदमशी गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला विवाह केला होता. उजमाने धर्म परिवर्तन करून दर्शना असे नवे नावही स्वीकारले होते. मात्र, विवाहानंतर उजमाच्या कुटुंबाने दशरथ व त्याच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली आणि काही वेळा मारहाणही केली. मात्र, पोलिस त्याची दखल घेत नाहीत', असा गंभीर आरोप करत उजमाने अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी 'पोलिस संरक्षण देण्यासंदर्भात अर्ज आला तर खरोखरच त्यांच्या जीवाला धोका आहे का, याची खातरजमा करून दोन दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घेऊ', अशी ग्वाही पोलिसांच्या वतीने देण्यात आली होती. त्यामुळे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने पोलिसांची ग्वाही नोंदीवर घेत २९ ऑक्टोबरला याचिका निकाली काढली होती.
मात्र, 'न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्याच दिवशी मिळाल्यानंतर हे जोडपे तात्काळ पोलिस कार्यालयात गेले. परंतु, पोलिसांनी त्यांना अनेक तास निव्वळ बसवून ठेवले. त्यानंतर सलग दोन दिवस पोलिसांनी त्यांना तशीच वागणूक दिली. त्यांना पोलिस आयुक्तांचीही भेट मिळू शकली नाही', असा आरोप करत उजमाने आता पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका केली आहे.