पीएमसी बँक घोटाळा
आणखी ५०० कोटींची मालमत्ता सील
जप्तीची कारवाई अधिक तीव्र
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई अधिक तीव्र केली आहे. ३५०० हजार कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर पोलिसांनी या घोटाळ्यातील आणखी ५०० कोटीची मालमत्ता सील केली आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गेल्या आठवड्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वारियामसिंग कर्तारसिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या आदेशावरून सजबीर सिंग मठ्ठा यांनी ही फिर्याद दिली होती. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवण्यात आली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आतापर्यंत या प्रकरणात जॉय थॉमस, वारियामसिंग, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या चौघांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये शनिवारपर्यंत साडेतीन हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने याप्रकरणात अधिक चौकशी करीत आणखी ५०० कोटींची मालमत्ता सील केली. यामध्ये कोणाच्या नावे किती मालमत्ता आहे याचा तपशील मात्र मिळू शकला नाही मात्र यामध्ये स्थावर मालमत्ता, बँक खाती यांचा समावेश असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.