म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या ४० जागांवर एकमत झाले असून पुणे मतदारसंघाचा हट्ट राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला आहे. त्यामुळे ही जागा आता काँग्रेस लढवेल. तर, औरंगाबाद, नगर, यवतमाळ, नाशिक, जालना, नंदुरबार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सात जागांवर अजून तिढा कायम असून या जागांबाबत निर्णय दिल्लीत होणार आहे.
लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी पुण्यासह औरंगाबाद, नगर, यवतमाळ, नाशिक, जालना, नंदुरबार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या आठ जागांवर चर्चा झाली. पुणे लोकसभेची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत काँग्रेसकडे आहे. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसकडे या जागेची मागणी केली होती. गेल्या अनेक बैठकांमध्ये या जागेसाठी अडून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर शुक्रवारी आपला हट्ट सोडला. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहिली आहे.
काँग्रेसला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीलाही सोबत घ्यायचे आहे. पालघर लोकसभेची जागा ही आघाडीत काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यांना ही जागा सोडण्यात येईल, असे काँग्रेसने ठरविले आहे. परंतु मित्रपक्षांना जास्त जागा सोडण्यास दोन्ही काँग्रेसकडून नकार देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईतील एक जागा आणि नाशिकची जागा आपल्या मित्रपक्षाला देण्याचा विचार सुरू आहे. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा राष्ट्रवादीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना देण्यासाठी हवी आहे. मात्र काँग्रेसने ही जागा देण्यास या बैठकीत नकार दिला.
लोकसभेच्या काही जागांवर तिढा असून त्याबाबतचा निर्णय हा दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांना एकच जागा
काँग्रेस आघाडीमध्ये लोकसभेच्या सात जागांबाबत तिढा कायम असून यात काही जागांची अदलाबदल करण्याचा विषय चर्चेत आहे. मात्र दोन्ही पक्ष आपल्या जागा सोडण्यास तयार नाहीत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेदेखील आघाडीत गेले आहेत. त्यांना हातकणंगले ही लोकसभेची जागा हवी आहे. ती जागा काँग्रेसच्या कोट्यातून देण्यास तयारी दर्शविली आहे, पण आणखी दोन जागांची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. मात्र त्यांना एकच जागा दिली जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.