म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय निर्माण करून कर्नाटकच्या धर्तीवर देशभरात समविचारी राजकीय पक्षांची आघाडी करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचवेळी पक्षसंघटनेची यंत्रणा आगामी निवडणुकांसाठी कोणत्याही वेळी सज्ज राहावी यासाठी अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, १२ जून रोजी सुमारे १५ हजार बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा गोरेगावच्या एनएसई कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
त्यादिवशी मुंबईतील सुमारे एक हजार रिक्षाचालक राहुल गांधी यांचे स्वागत करतील, असे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. काँग्रेस पक्षाची नाळ देशातील सामान्य जनतेशी जोडलेली आहे. आम्ही 'सुटबूटवाले' नसून सामान्य जनतेला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याने सामान्य रिक्षाचालक राहुल गांधी यांच्या स्वागताला येणार असल्याची माहिती निरुपम यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी न्यायालयात हजर झाल्यानंतर राहुल गांधी गोरेगाव येथील काँग्रेस पक्षाच्या बूथ कार्यकर्ता महामेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लक्षात घेता, पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पक्षाला नवीन ताकद देईल, असा दावा निरुपम यांनी केला.