रवींद्र चव्हाण यांच्या सिडकोला सूचना
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळ हा मोठा प्रकल्प आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पाला ग्रामस्थ सहकार्य करत आहेत. त्यामुळे वस्तूस्थिती पाहून अहवाल तयार करा आणि विमानतळबाधित ग्रामस्थांचे योग्य रितीने पुनर्वसन करा, अशा सूचना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शनिवारी त्यांनी या परिसराची पाहणी करून ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे पन्नास टक्के काम आता पूर्ण झाले आहे आणि पन्नास टक्के काम बाकी आहे. मात्र या अर्ध्या कामातच या परिसराला लागून असलेल्या गावांत पावसाचे पाणी साचू लागले आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने विमानतळ परिसरात आणि परिसराला लागून असलेल्या गावांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे या गावांवर भीतीचे सावट आहे. या परिसरातील दहा गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र पारगाव आणि डुंगी या गावांचे पुनर्वसन केले जाणार नाही आणि याच गावात सर्वाधिक पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सिडकोच्या नियोजनावर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला.
विमानतळाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या पारगाव आणि डुंगी या गावात पावसाचे पाणी शिरल्याने गावातील घरांचे, घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातील पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिडको व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांनी या गावांची पाहणी केली. त्यावेळी लोकांनी आमच्या गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोच्या वातीने ग्रामस्थांना देण्यात आले. मात्र त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी गावात येऊन गावातील अर्धी घरे पाण्याखाली जातात. याबाबत अनेकांनी उरणच्या आमदारांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी या गावांची पाहणी केली. पावसाळी पाणी गावात शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा, मागण्या ऐकल्या आणि सिडको अधिकाऱ्यांना बोलावून पुनर्वसन कसे करता येईल, याबाबत सूचना केल्या. त्यासाठी कोणतीही मदत देण्याचे आश्वासन दिले. शिवाय गावाच्या पुनर्वसनाचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत लावून धरून योग्य उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी तहसीलदार दीपक आकडे, अरुण भगत, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसरपंच विकास नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.