म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा केल्यानंतर तातडीने शुक्रवारी रात्रीच्या अंधारात सुरू झालेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी उठवलेला आवाज दडपण्याचे तंत्र सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर करून राबवले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आरेमध्ये एकत्र आलेल्या पर्यावरणप्रेमींना मुंबई पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, सशस्त्र पोलिस दलाची मोठी कुमक आणून रोखण्यात आले. प्रस्तावित कारशेडस्थळी ठिय्या देऊन बसलेल्या २९ आंदोलकांना अटक करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल केलेल्या या सर्वांना बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली व त्यानंतर त्यांची ठाणे तुरुंगात पाठवणी करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने शुक्रवारी संध्याकाळीच वृक्षतोड सुरू झाली. याला नागरिक व पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये एकत्र येऊन विरोध केला. पोलिसांची कुमक वाढल्यानंतर त्यापैकी काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उरलेल्या नागरिकांनी बिरसा मुंडा चौकात घोषणा, भजन, गाणी म्हणण्यास सुरुवात केली. आम्हाला कंत्राटदारांना भेटून परवानगी पत्राची प्रत पाहायला मिळावी, अशी मागणी ते करीत होते. पण, रात्री अडीचच्या सुमारास नागरिकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली. काही मुलींना केसांना ओढून, तर अनेकांना फरफटत आंदोलनस्थळापासून दूर करण्यात आले. या सर्वांना बळपूर्वक पोलिस वाहनांमध्ये कोंबून आरे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. भादंवि कलम ३५३ (सरकारी काम रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांवर हल्ला), ३३२ (सरकारी काम रोखण्यासाठी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांस दुखापत करणे), १४३ (बेकायदा एकत्र येणे), १४९ (समान उद्देशाने केलेले बेकायदा कृत्य) असे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले व शनिवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या, सोमवारीच सुनावणी होईल. या कारवाईनंतर शनिवारी दिवसभर आरे शांत होते. कारशेडस्थळी पोलिस-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा व वृक्षतोडीनंतरचा हिरवा चिखल तेवढा उरला होता. (संबंधित बातम्या...३)