म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील २२ जिल्ह्यांमधील डोंगराळ भागांच्या विकासासाठी राज्य सरकारने ३१ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितले. विकास कार्यक्रमांच्या एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांतील खर्च भागविण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ अशा २२ जिल्ह्यांतील डोंगराळ भागांच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. डोंगराळ भागांच्या विकासासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ९५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातून चार महिन्यांच्या खर्चासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. यामुळे २२ जिल्ह्यांतील डोंगराळ भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा निधी राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून खर्च करता येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.