अवनीप्रकरणी काँग्रेसचा आरोप; सीबीआय चौकशीची मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जनावरांची तस्करी करणाऱ्या माफियांमध्ये संगनमत असल्यामुळेच महाराष्ट्रात वाघांचा जीव जात आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना तत्काळ मंत्रिपदावरून हटवून अवनी वाघीण हत्येप्रकरणी त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी', अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी शनिवारी केली. त्याचवेळी, 'सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेणार असाल तर मग अवनीला गोळी मारण्याचे पापही अंगावर घ्या', असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.
सुधीर मुनगुंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघांच्या मृत्यूमध्ये सतत कशी वाढ झाली त्याची आकडेवारीच निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. 'मागील ३ वर्षांपासून सतत महाराष्ट्रामध्ये वाघांचा मृत्यू होत आहे. सन २०१५मध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला, सन २०१६मध्ये वर्षभरात १६ वाघांचा मृत्यू झाला तर, सन २०१७मध्ये २१ वाघांचा मृत्यू झाला आहे. यातील काही वाघांचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झाला असून, काहींना मारण्यात आले आहे. ज्या पद्धतीने मृत वाघांची संख्या वाढत आहे, त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या आचरणावर संशय येतो', असे मुनगंटीवार म्हणाले.
'सन २०१० मध्ये संपूर्ण भारतात १७०६ वाघ होते. त्यातील १९० वाघ महाराष्ट्रात होते. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे आज २०१८ मध्ये भारतात २,२२६ वाघ आहेत. त्यातील ७२ वाघ ताडोबामध्ये आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण देशात व्याघ्र अभयारण्य असलेल्या ठिकाणी वाघांच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स सिस्टम बसवण्यात आली आहेत. पण, महाराष्ट्रामध्ये ही सिस्टम असूनही बसवण्यात आलेली नाही. दोनवेळा निविदा मागवून ती रद्द करण्यात आली. त्याचीही चौकशी व्हायला हवी', असेही ते म्हणाले.
'सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये अवैध शिकारींचे प्रमाण वाढले आहे. एका मेलेल्या वाघाचे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ५० हजार डॉलर मिळतात. अवनीला मारले गेले ते देखील संशयास्पद आहे. वनखात्याकडे सर्व यंत्रणा असतानाही त्यांनी ५ कोटी खर्च करून एका अवैध शिकाऱ्याकरवी अवनीला मारण्याचे आदेश दिले. तिच्या मृतदेहाची तपासणी न करता तो जाळून टाकण्यात आला. एकप्रकारे त्यांनी पुरावाच नष्ट करून टाकला. यावरून वनमंत्री मुनगंटीवारांचे शिकारी माफियांशी संगनमत आहे, या आमच्या आरोपांना आणखी पुष्टी मिळते', असेही निरुपम पुढे म्हणाले.
आज, रविवारी सायंकाळी ४ वाजता अवनीच्या हत्येच्या निषेधार्थ वरळी सी फेस ते शिवाजी पार्क असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये निरुपम यांच्यासह सर्व वन्यप्राणीप्रेमी आणि पर्यावरणवादी संस्थांचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
'अवनीच्या शिकारीचे पापही घ्या…'
अवनीप्रकरणी काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. 'वनमंत्री स्वत: बंदूक घेऊन अवनीला ठार करण्यास गेले नसल्याचे सांगत मुनगंटीवार यांचा बचाव करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. असे असेल तर मुख्यमंत्र्यांनी गोळ्या झाडलेल्यांचा सत्कार करायला हवा', असा टोला उद्धव यांनी लगावला. 'सुधीरभाऊ बंदूक घेऊन गोळी मारायला गेले नव्हते, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राइकला मोदीदेखील बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचे श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचा पापदेखील मुनगंटीवार आणि सरकारने घ्यायला हवे', असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
…………………………
'निरुपम यांच्यावर दावा करणार'
'काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन केलेले तथ्यहीन आरोप मी आजवरच्या राजकीय आयुष्यात बघितले नाहीत. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार', अशी प्रतिक्रिया वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. तर, उद्धव यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना, 'वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेला काही चुकीचे किंवा शंकास्पद वाटत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते तयार असतील तर हे आम्ही करू शकतो', असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले.