म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंत सात तलावांमध्ये ३६.६९ टक्के म्हणजे पाच लाख दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली. जुलैमधील पावसाच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पालिकेच्या जल विभागातर्फे सांगण्यात आले. सर्व सात तलाव पूर्ण भरण्यासाठी साडेचौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.
यंदाच्या मान्सूनमध्ये जून महिन्यात सरासरीइतका पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने संततधार धरल्याने जुलैची सरासरी पहिल्या पंधरवड्यातच भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात असून या भागात पावसाचा चांगला जोर आहे. त्यामुळे तलावांमध्ये झपाट्याने पाण्याची वाढ होत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने पालिकेला मुंबईकरांना कोणत्याही कपातीविना पाणीपुरवठा करता येणे शक्य झाले.
यंदाच्या मोसमात जुनपासूनच पावसाची दमदार साथ मिळाल्याने मुंबईकरांना पाण्याची चिंता राहाणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अप्पर वैतरणामध्ये १७. ६२ टक्के, मोडकसागर ७९. ४६ टक्के, तानसा ५५.७५, मध्य वैतरणा ४२.७५, भातसा २८.३४, विहार ५४.२०, तुळशी ८४.०६ इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुमारे साडेसहा लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा तलावांमध्ये होता. यंदा पाच लाख, ३० हजार दशलक्ष लिटर इतका साठा जमा झाला आहे. यंदाच्या पावसात विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा, तानसा या तलावांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली आहे.