म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'सौर ऊर्जा स्वस्त व शाश्वत असल्यामुळे येणाऱ्या काळात पारंपरिक ऊर्जेला चांगला पर्याय उपलब्ध होण्याच्या औष्णिक संचासोबत सोलर संच उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार महानिर्मिती कंपनीकडील उपलब्ध असलेल्या जमिनींवर २५०० मेगावॉट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत', असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगतिले.
कोळशाच्या तुटवड्यामुळे मधल्या काळात महाराष्ट्राच्या काही भागात भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पाऊले उचलत बैठकीचे आयोजन केले होते. 'वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या तुटवडा होऊ नये म्हणून दररोज ३५ रॅक कोळसा वीजनिर्मिती केंद्रांना पुरवला जाईल. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून साडेसात हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे', अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोडशेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनाची परिस्थिती उद्भवते. हे भारनियमन टाळण्यासाठी आणि विजेचे योग्य नियोजन करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत संचांची कार्यक्षमता वाढवून अधिक वीजनिर्मिती करण्याचे आदेशही दिले.