म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
खासदार राजेंद्र गावित यांच्या गाडीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हरणाचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून मागणी करण्यात आलेले सीसीटीव्ही अजूनही का रखडले आहेत, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. उद्यानामध्ये स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही यामुळे वनखात्याचा गैरकारभार उघड होण्याची भीती आहे का, असेही यासंदर्भात विचारले जात आहे. मात्र आता खासदारांच्या गाडीमुळे हरणाचा मृत्यू झाल्याने सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्सने सप्टेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सने वाघ-सिंहांच्या पिंजऱ्यांपर्यत थेट पायवाट जाण्याचा मुद्दा मांडला होता, त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी या परिसरात सीसीटीव्हीची मागणी केली होती. या मागणीला ऑक्टोबर २०१९ मध्ये उत्तर देण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फिरणाऱ्या गाड्या २० किलोमीटरची वेगमर्यादा पाळत नसल्याचेही समोर आले होते. यामध्ये पोलिस आणि महापालिकेच्या गाड्यांचाही समावेश होता असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. यानंतर बोरिवलीतील स्थानिक रिव्हरमार्चर विक्रम चोगले यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीत दरवर्षी गाड्यांमुळे किमान सात ते आठ मोठे प्राणी दगावतात असे सांगण्यात आले होते. हे वास्तव असूनही उद्यानामध्ये वेगमर्यादेबद्दलचे फलक, स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्हींची तरतूद झालेली नव्हती अशी तक्रार चोगले यांनी केली. चार वर्षांपासून वारंवार हा विषय मांडूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे उद्यानात होणारे काँक्रिटीकरण, उद्यानाबाहेर होणारी लाकडाची विक्री, वनाधिकाऱ्यांच्या गाड्यांनी न पाळलेले नियम अशा अनेक गोष्टी पुराव्यासह समोर येतील, अशी भीती वाटत असल्यानेच हे सीसीटीव्ही आजवर लावले गेले नाहीत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच संरक्षित क्षेत्रातून भांडुपमार्गे नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या जाणाऱ्या गाड्याही उघड होतील, त्यामुळेही हा पर्याय अंमलात आणला जात नसावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. रात्री अपरात्री फिरणाऱ्या गाड्यांमुळे अनेक सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडतात. गाड्यांखाली चिरडल्या जाणाऱ्या बेडूक, साप, सरडे यांची मोजदाद करता येत नाही. त्यामुळे यावर कायदेशीर नियंत्रण गरजेचे आहे असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हरणाच्या मृत्यूनंतर वेगाने चक्र फिरायला सुरुवात झाली असून किमान पर्यटक क्षेत्रामध्ये दर १०० मीटरवर सीसीटीव्ही बसवण्याबद्दल चर्चा झाली आहे. तसेच वेगमर्यादा, जंगलातील नियम याबद्दल फलकही लावण्यात येणार आहेत. संरक्षित क्षेत्रामध्ये नेटवर्क समस्येमुळे सीसीटीव्ही लावणे शक्य होणार नाही तसेच कान्हेरीच्या वाटेवरही सीसीटीव्ही लावणे शक्य होणार नाही मात्र त्यासाठी या परिसरात स्पीड ब्रेकरची संख्या वाढवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. फलक लावण्याचे, तसेच स्पीड ब्रेकरचे कामही दोन महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या पिंजऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू असून रस्त्यावर सीसीटीव्ही कुठे लावता येईल याची चाचपणी सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.