म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्याला प्रत्यक्षात पैसे मिळाले नसल्याचे प्रकरण आणि बियाणे खरेदी करण्यासाठी आपल्या किडन्या विकाव्यात, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्याचे प्रकरण विधान परिषदेत मांडल्याबद्दल त्या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली, असा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे शुक्रवारी केला. त्यानंतर 'या दोन्ही शेतकऱ्यांना ताबडतोब सोडून द्यावे, तसेच त्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे', असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी नामदेव पतंगे याचे प्रकरण सभागृहात मांडले. 'या शेतकऱ्याने आपल्याला व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बी-बियाणे खरेदीसाठी किडनी विकायची परवानगी मागितली होती', असे मुंडे यांचे म्हणणे होते. मुंडे यांनी वाशिम जिल्ह्यातील अशोक मनवर या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे दिलेले प्रमाणपत्र सभागृहात दाखवले. 'प्रमाणपत्र मिळाले पण पैसा मिळाला नाही', असे मुंडे म्हणाले. या दोन्ही बाबी आपण सभागृहात मांडल्या म्हणून त्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. त्यांनतर सभापतींनी या शेतकऱ्यांना सोडून देण्याचे निर्देश दिले आहेत.