मनोज जालनावाला
गुजरात येथे पार पडलेल्या गुजरात शाही फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरवण्यात आलेल्या 'पिंड'ची निर्मिती व कथालेखन करणारा दिवाळे गावातील तरुण प्रेमेश चंद्रकांत बोस याने लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी मुंबईतील दिवाळे गावात राहणाऱ्या प्रेमेश बोसच्या आईवडिलांचा पारंपरिक मच्छिमारीचा व्यवसाय. घरी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने जेमतेम बारावीपर्यंतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेलापूर येथील शाळेत घेतले. अर्धवट शिक्षण सोडून आईवडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा विभागात कंत्राटी पद्धतीवर काम मिळवले. तो आजपर्यंत सफाई कामगार म्हणून तेथे काम करत आहे. लहानपणापासून गाणे व कविता गाण्याचा छंद लागलेल्या प्रेमेश बोस याला शालेय जीवनातही नवनवीन पुस्तके वाचण्याची सवय होती. यातून समाजात मृत व्यक्तीच्या दहाव्या दिवशी दशक्रिया निमित्ताने पिंड पूजन करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही सुरू आहे. गावालगतच्या खाडीकिनारी सुरू असलेला दशक्रिया विधी पाहून पिंडदान या विषयावर काहीतरी लिहावे असे त्याने मनात ठरवले.
दशक्रिया विधीच्यावेळी आणलेल्या एका ताटात जेवण ठेवून त्याला कावळा शिवला पाहिजे. त्या पिंडाला कावळ्याने चोच लावली की मृत आत्मास शांती मिळते अशी धार्मिक भावना असते. पिंड या विषयावर केलेल्या लेखनातून एक लघुपट निर्मिती करण्याची कल्पनाही प्रेमेशच्या मनात आली. त्यातून आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याने पिंड या लघुपटाची निर्मिती केली. एका नवख्या मुलाची कोणतीही सांस्कृतिक व शैक्षणिक पाठबळ आणि परिस्थिती नसताना प्रेमेश बोसने लघुपट निर्मिती करण्याचा घेतलेला ध्यास हा कौतुकास्पद आहे. पिंडची चिपळूण येथे झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून भारतातून प्रथम आणि अहमदाबाद येथील शाही फिल्ममध्येही भारतातून प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली.
जेमतेम शिकलेल्या ग्रामीण भागातील एका तरुणाने लेखन व निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत धार्मिक विषय हाताळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. पालिका आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला खरा परंतु नवी मुंबईतील राज्यकर्त्यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत प्रेमेशच्या कार्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही, याची खंत प्रेमेश बोसला आहे.