म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत शिवसेना आणि भाजप युतीने एकसंधपणे प्रचार केला. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीला चांगले यश मिळेल, असा विश्वास भाजपचे आमदार आणि लोकसभेच्या उमेदवारांनी मंगळवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. त्यात भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह आहे. मंगळवारी भाजपच्या आमदार आणि लोकसभेच्या उमेदवारांची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील विभागवार जबाबदारी भाजपचे मंत्री आणि आमदारांवर सोपवण्यात आली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदारांनी आपले अहवाल
यावेळी दिले. राज्यात अनेक वर्षे शिवसेनेसोबत युती आहे. मात्र यावेळी अखेरीस युती होऊनही सेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी चांगले काम केले, असे सगळ्याच विभागीय नेत्यांनी सांगितले. युतीचे कार्यकर्ते एकोप्याने काम करत होते. भाजपने प्रचारयंत्रणा चांगली राबवली. बूथप्रमुखांवर मुख्य जबाबदारी होती. त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे चांगले यश सर्वच जागांवर मिळेल, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला.