म. टा. प्रतिनिधी, लातूर
आपल्या सर्वांच्या परिश्रमातून लातूर जिल्हा करोनामुक्त राहिला आहे. यापुढेही तो सुखरूप ठेवायचा आहे, असे सांगून तुम्ही आपले गाव राखा, मी २४ तास आपल्या मदतीसाठी सजग आहे, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पदाधकाऱ्यांना केले आहे.
अमित देशमुख यांनी बुधवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाऊनच्या संदर्भाने माहिती दिली त्यांच्याकडून गावपातळीपर्यंतची माहिती घेतली. समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. शासन, प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी केल्यामुळे करोनाचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात झालेला नाही. परंतु, अद्याप लढा संपलेला नाही. यापुढेही सुखरूप रहायचे असेल तर परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल, असेही देशमुख यांनी सांगितले.
शेती व शेतीशी निगडीत उद्योग, व्यवसायाची कामे सुरू करा, लॉकडाऊन दोनमध्ये ग्रामीण भागांसाठी काही नियम शिथीलही केले आहेत. त्यानुसार आता शेतीची सर्व कामे सुरू करायची आहेत. रोजगार हमी, जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करायची आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती हद्दी बाहेरील रस्ते, सिंचन या संबंधीच्या बांधकामांना परवानगी दिली आहे. मात्र, हे करीत असताना संबंधित विभागाची रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. टंचाई निवारणाच्या कामना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामध्ये पाणीटंचाई, विजपुरवठा या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले.