'शिकार'प्रकरणी वनमंत्र्यांना जाब विचारला : शिवसेनेचा दावा
मंत्रिमंडळ बैठकीत विषयच निघाला नाही: मुनगंटीवाराचा प्रतिदावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अवनी वाघिणीला ठार केल्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटल्याचे कळते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाब विचारल्याची चर्चा बैठकीनंतर पसरली होती; मात्र, बैठकीत वाघिणीचा असा कोणता विषयच निघाला नसल्याचा दावा मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
वाघिणीच्या हत्येप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे कळते. अवनीचे दोन्ही बछडे अजून बेपत्ता आहेत. त्यांचे काय झाले, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना केल्याचेही समजते. अवनी वाघिणीच्या हत्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. त्यावर मुख्य वनरक्षक आयुक्तांची समिती चौकशी करत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
शिवसेनेचा हा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावला आहे. 'मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान अवनीबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी माझ्याकडे कोणतीही विचारणा केली नाही. बैठकीत मी सुमारे ५० मिनिटे हजर होतो. त्यावेळी कोणीही हा प्रश्न उपस्थित केला नाही. माझ्या आधी किंवा नंतर कोणी याबाबत काही म्हणाले असेल तर मला माहिती नाही,' असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
गोपनीयतेच्या तत्त्वाला हरताळ
शिवसेना आणि भाजप यांच्यातील दावे-प्रतिदावे रंगले असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेविषयी गोपनीयता बाळगण्याच्या तत्त्वाला हरताळ फासण्यात आल्याची चर्चा मंगळवारी मंत्रालयात सुरू होती. शिवसेनेच्या एका मंत्र्याने तर बैठकीतील मुद्द्यांविषयी लेखी पत्रक काढून तेच प्रसारमाध्यमांना वाटल्याचे सांगण्यात आले.
---