जागावाटपावरून युतीतील तिढा वाढला
म. टा.विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते गुरूवारी केले. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही लगेच पाठिंबा दर्शविला. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नसून रोज नवनव्या प्रस्तावाच्या चर्चांना जोर आला आहे. अशावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी १४४ जागांची मागणी केली आहे. 'शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,' असे वक्तव्य रावते यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे खासदार संजय राऊत यांनीही समर्थन केले आहे. 'अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे रावते जे बोलले त्यात काहीच गैर नाही,' असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी निवडणुका सोबतच लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
युतीमधील तिढा वाढला
दरम्यान विधानसभेच्या २८८ पैकी पक्षाला किमान १३५ जागा पाहिजेत. मित्रपक्षांना आमच्याकडूनही ९ जागा द्यायला आम्ही तयार आहोत. शिवाय आम्ही दोन पाच कमी जागा घ्यायलाही तयार होऊ, पण भाजपनेही दोन पावले मागे यायला हवे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे कळते. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही. भाजपला शिवसेनेसाठी १२० पेक्षा अधिक जागा सोडायच्या नाहीत आणि शिवसेनेला ते मान्य नाही, असं शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. दुसरीकडे २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली असून भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा जिंकता आल्या. त्यामुळं शिवसेनेपेक्षा भाजपला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिकाही या नेत्याने मांडली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे युतीच्या जागावाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढेल असेच दिसते.
नाणारचा फेरविचार
नाणारचा प्रकल्प रद्द करण्याबाबत अधिसूचना काढल्यानंतहरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील महाजनादेश यात्रेदरम्यान या प्रकल्पाचा फेरविचार करण्याबाबतचे वक्तव्य केल्याने शिवसेना नेतृत्व नाराज असल्याचे समजते. अशाप्रकारचे मुख्यमंत्र्यांचे वागणे योग्य नाही अशी भूमिका शिवसेना नेतृत्वाने खासगीत व्यक्त केल्याचेही समजते.