\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bकरोना लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले असून, लाखोंचे नुकसान झाले आहे. अनेक हॉटेलचालकांना परप्रांतीय मजुरांना घरी बसवून पगार द्यावा लागला.
सिल्लोड येथील तरुण व्यावसायिक प्रणव दाणी आणि अमोल कुलकर्णी यांनी हॉटेल व्यवसायात फेब्रुवारी महिन्यात पदार्पण केले. मोंढ्यातील एका हॉटेलच्या टेरेस गार्डनवर त्यांनी अल्टीट्युड लाँज आणि कॅफे सुरू केला. त्यांच्याकडे परप्रांतीय कारागिरांचा आठ जणांचा स्टाफ होता.
आता करोनामुळे काही कारागिरांना गावी पाठवले. पाच जणांचे वेतन खिशातून देणे सुरू आहे, अशी माहिती संचालक प्रणव दाणी यांनी दिली. सध्या त्यांचे महिन्याचे अडीच लाखांचे उत्पन्न बुडत आहे.
एपीआय कॉर्नर येथील गांगवे मामा यांचे लोकसेवा प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये अधिकृत तीस कामगार आहेत. यांचा पीएफ देखील भरण्यात
येतो. मात्र, लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. येथील कामगारांना मार्च महिन्यात पूर्ण पगार हॉटेलकडून तर एप्रिल महीन्यात अर्धा पगार देण्यात आला. मे महिन्यातही लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण होईल इतके राशन देण्यात येणार असून, आतापर्यंत दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेलमालक गणेश गांगवे यांनी दिली.
\Bलाखोंचे नुकसान
\Bमुकुंदवाडी येथील शिवा हॉटेलही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पंधरा जणांचा स्टाफ आहे. लॉकडाऊननंतर पहिल्या महिन्यात कामगारांना हॉटेल व्यवस्थापनाकडून पगार देण्यात आला. सध्या हॉटेलच्या देखरेखीसाठी केवळ दोघे असून, त्यांचा खर्च देखील हॉटेल मालक नवनाथ डांगे करीत आहेत. या दोन महिन्यात पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती डांगे यांनी दिली.