म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेचे विजेचे खांब कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी नेरूळमध्ये भरदिवसा एका रिक्षावर हा खांब कोसळल्याने रिक्षाचा पुढचा भाग दबला गेला. यावेळी रिक्षात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नेरूळ सेक्टर २०मध्ये पूनम टॉवरजवळील विजेचा खांब गंजल्याने अचानक तो ऑटोरिक्षावर पडून रिक्षाचे नुकसान झाले. नवी मुंबईतील दिवाबत्तीचे खांब सिडकोने उभारून सुमारे २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे बहुतेक खांब गंजले आहेत. त्यामुळे हे खांब कोसळल्याच्या घटनाही घडतात. या महिन्यात कोसळून पडलेला हा चौथा खांब आहे. मध्यंतरी तत्कालीन आयुक्तांनी विद्युत विभागाच्या इंजिनीअरसोबत अशा खांबांची पाहणी केली होती. जे खांब वरून गंजलेले आढळले होते, ते बदलण्यात आले होते. मात्र अन्य खांबांचीही तीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी येथे नवीन खांब बसवावेत, अशी मागणी रहिवासी भरत सामंत यांनी केली आहे.