म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत लावलेल्या लहान कचराकुंड्या मोडकळीस आल्या आहे. काही ठिकाणांहून त्या चोरीला गेल्याचे प्रकारही निदर्शनास येत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. सार्वजनिक ठिकाणी नाकिरांनी कचरा टाकू नये, यासाठी पालकेने शहरामध्ये सार्वजनिक विविध ठिकाणी ५००पेक्षा अधिक लहान कचराकुंड्या बसवल्या होत्या. मात्र स्वच्छ सर्वेक्षणानंतर या कचराकुंड्यांमध्ये टाकण्यात आलेला कचरा उचलण्याकडेदेखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यात कचरा पडून असल्याने नागरिकही त्याचा वापर टाळू लागले. शिवाय काही ठिकाणच्या कचराकुंड्या गर्दुल्ल्यांनी चोरल्याचेही समोर आले आहे. काहींनी या कचराकुंड्यांची मोडतोडही केली आहे. त्यामुळे यासाठी खर्ची पडलेले पालिकेचे लाखो रुपये वाया गेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकने बसवलेल्या लहान कचराकुंड्या गर्दुल्ल्यांकडून चोरीस गेल्या आहेत. तर काही आंदोलनात आंदोलकांनी या कचराकुंड्या तोडल्याचेही निदर्शनास आले आहे. पालिकेकडून या कचराकुंड्या स्वच्छ करण्यात येणार असून मोडकळीस आलेल्या कचराकुंड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन