म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
तेरा वर्षांपूर्वी पुण्यातील विप्रो बीपीओ कंपनीतील कर्मचारी तरुणीवर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेले पुरुषोत्तम बोराटे व प्रदीप कोकाटे या दोघांच्या शिक्षा अंमलबजावणीत राज्य सरकारकडून कोणताही गैरवाजवी, अवास्तव व असयुक्तिक विलंब झालेला नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला. तसेच या दोघांची याचिका फेटाळून लावण्याची विनंतीही न्यायालयाला केली.
राज्य सरकारप्रमाणेच पुण्यातील येरवडा तुरुंग अधीक्षकांनी व केंद्र सरकारनेही प्रतिज्ञापत्र दाखल करून विलंब झाल्याचा आरोप फेटाळून लावला. त्यानुसार आज न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर पुढील युक्तिवाद होणार आहे.
या दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आणि नंतर राष्ट्रपतींनीही त्यांच्या दया याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने यावर्षी १० एप्रिल रोजी वॉरंट काढून २४ जून ही फाशीची तारीख निश्चित केली आहे. मात्र, 'शिक्षा अंमलबजावणीत अवास्तव विलंब झाला असल्याने आमची फाशी थांबवावी', अशा विनंतीच्या याचिका आता या दोघांनी केल्या आहेत.
..
आठ पत्रांनंतर पुणे सत्र न्यायालयाकडून 'वॉरंट'
राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली असल्याचे राज्य सरकारने १९ जून २०१७च्या पत्राद्वारे कळवताच येरवडा तुरुंग अधीक्षकांनी त्याच दिवशी पुणे सत्र न्यायालयाला पत्र लिहून कळवले. त्याशिवाय नंतरही ऑगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत तब्बल सात वेळा सत्र न्यायालयाला पत्र लिहून फाशीच्या अंमलबजावणीबाबत आदेश काढण्याची विनंती केली, असेही सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
..
नाइट ड्युटीला जाताना तरुणीला केले होते लक्ष्य
जवळपास तेरा वर्षांपूर्वी १ नोव्हेंबर २००७ रोजी पुण्यातील विप्रो बीपीओ कंपनीतील कर्मचारी तरुणी ही कंपनीच्या कंत्राटावरील वाहनातून नाइट ड्युटीसाठी जात असताना कारचालक पुरुषोत्तम बोराटे व त्याचा साथीदार प्रदीप कोकाटे यांनी कार अचानक एका निर्जनस्थळी नेली होती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्यानंतर त्यांनी तिची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या करतानाच तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहराही विद्रुप केला होता. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने मार्च-२०१२मध्ये या दोघांनाही दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती.