म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भीमा कोरेगाव प्रकरणाचे सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी पाच विचारवंतांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींना तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना देशातील विविध भागांतून अटक केली आहे. या कारवाईच्या विरोधात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ३७ संघटनांतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कोळसे पाटील बोलत होते. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून मानवाधिकारासाठी लढणाऱ्या पाच विचारवंतांवर कायद्याचा गैरवापर करून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अटक केलेल्या विचारवंतांची ताबडतोब सुटका करावी, अशी मागणी यावेळी अॅड. मिहीर देसाई यांनी केली. ही अटक म्हणजे देशातील जातीयवादी सरकारने चालवलेली खेळी असून, याविरुद्ध आमचा लढा चालूच राहणार आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.
सरकारचा देशात हिंदू अजेंडा चालू असल्याचा आरोप करून, माओवादी साहित्य वाचणे किंवा ठेवणे याचा अर्थ माओवादाला समर्थन देणे असा होत नाही. आम्ही मार्क्सच्या संदर्भात पुस्तके वाचली म्हणून काय आम्ही मार्क्सवादी ठरत नाही. पुणे पोलिसांची ही कारवाई म्हणजे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, भिडे, एकबोटे यांना वाचविण्याचा कट आहे, असा गंभीर आरोपही कोळसे पाटील यांनी केला.
फक्त काही पत्रांचा आधार घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची हत्या करण्याचा डाव आखल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, पत्रांच्या आधारावर हे आरोप सिद्ध होत नसल्याचा दावा कोळसे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सनातनच्या साधकांच्या अटकसत्रानंतर आपल्यावरही छापे पडणार याची कुणकुण आम्हाला लागलीच होती, असेही आंबेडकर यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले.