ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारला साकडे
वैभव भोळे, अलिबाग
नवी मुंबई नियोजित विमानतळाच्या कामासाठी वाघोळीवाडा येथील टेकडी भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे टेकडीवरील सुमारे दोन हजार वर्षे जुन्या बौद्ध लेण्यांसह, केरुमाता देवीचे प्राचीन मंदिराचे अस्तित्त्व नष्ट होणार आहे. लेण्यांचे व मंदिराचे अस्तित्त्व जपण्यासाठी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीसह परिसरातील विविध संस्था व नागरिक सरसावले असून, त्यांनी सरकारला साकडे घातले आहे. तसे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
लेण्यांचे जतन व बचाव करण्यासाठी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने येथील दोन हजार वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेणींचे तलाठी, तहसीलदार, भूमिअभिलेख, पुरातत्त्व विभाग यांच्यातर्फे सर्वेक्षण, नकाशे करून सुरक्षा आणि संवर्धन करावे, यासाठी ऑक्टोबर २०१६मध्ये निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सिडकोला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सिडकोने कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, पुरातन लेण्या तसेच प्राचीन मंदिराचे जतन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
पनवेल येथील वाघोलीवाडा येथील टेकडीवर प्राचीन ऐतिहासिक बौद्ध लेणी आहेत. तसेच याच लेणीच्या मुख्य द्वाराला केरूमाता या कराडी समाजाच्या मातेचे प्राचीन मंदिर आहे. मुंबई विमानतळाचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या विमानतळामुळे या पुरातन लेण्या तसेच प्राचीन मंदिराचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वीच ही टेकडी भुईसपाट करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी याठिकाणी वापरण्यात येणारे फटाके व अवजड मशिनरीमुळे लेण्यांना धोका पोहोचत आहे. सन २०१३पासून सिडको संचालक, रायगड जिल्हाधिकारी, पनवेल तहसीलदार, सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभाग यांना स्थानिक रहिवासी, विविध संस्था, संघटना तसेच काहींनी वैयक्तिकरीत्या पत्रव्यवहार व निवेदने देऊन केरूमाता मंदिर तसेच बौद्ध लेणी जतन व बचाव करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, बौद्ध लेणी तसेच केरुमाता मंदिराचा वारसा जपण्याची मागणी केली आहे.