खेळणी मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर
- खेळण्यांचा बाजार १५ टक्क्यांपर्यंत घसरला
- आयात शुल्कात ५०० टक्के वाढ
- कोरोनामुळे चीन, मलेशियाची आयात थांबली
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
चीनचा दबदबा असल्याने आयात शुल्कात केलेली वाढ व आता कोरोना विषाणूची साथ, या दोन कारणांमुळे भारतीय खेळणी बाजार सध्या प्रचंड संकटात आहे. देशातील एकूण बाजाराच्या ४० टक्के उलाढाल असलेल्या मुंबईतील या क्षेत्रातील विक्री १५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मागणी नसतानाही खेळण्यांचे मागील दोन वर्षात दुप्पट होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
खेळणी बाजारात मागील १० ते १५ वर्षात चीनचा दबदबा चांगलाच वाढला. एरव्ही भारतात तयार झालेले एखादे ३०० रुपयांचे खेळणे चीनी बनावटीचे असल्यास त्याची किंमत जेमतेम६० ते ८० रुपयांचे असते. यामुळेच देशातील एकूण मागणीच्या ७५ ते ८५ टक्के खेळणी आयात होतात. त्यापैकी ७५ टक्के खेळणी एकट्या चीनमधून येतात. चीनखेरीज सिंगापूर, मलेशिया आणि श्रीलंका येथील खेळणी भारतात आयात होतात. चीनची ही आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील दोन वर्षात आयात शुल्कात ५०० टक्के वाढ करुन आता आयात शुल्क ६० टक्के करण्यात आले आहे. यामुळे खेळणी बाजार संकटात असल्याचे युनायटेड टॉय असोसिएशनचे म्हणणे आहे.
असोसिएनशचे प्रवक्ते रेहान दोरजीवाला यांनी 'मटा'ला सांगितले की, 'खेळणी हे क्षेत्र जवळपास ४ हजार कोटी रुपयांचे आहे. देशभरात जवळपास १० हजारहून अधिक घाऊक व्यापारी व लाखाहून अधिक किरकोळ विक्रेते या क्षेत्रात आहेत. पण केंद्र सरकारने आयात शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने खेळण्यांचे दर भरमसाठ वाढले आहेत. खेळणी थेट १०० टक्के महाग झाली आहेत. केवळ श्रीमंत कुटुंबेच आज खेळणी करू शकतात. मध्यमवर्गीयांसाठी खेळणी आवाक्याबाहेर गेली आहेत. यातून विक्री कमी होऊन या क्षेत्रातील रोजगारही संपुष्टात आला आहे.'
एकीकडे आयात शुल्कात वाढ झाली असताना मागील महिनाभरापासून कोरोना विषाणू साथीचा परिणाम चीनी खेळण्यांवर झाला आहे. आधीच आयात कमी झाली असताना या साथीमुळे चीनखेरीज मलेशिया व सिंगापूर येथील खेळण्यांची आयात थांबली आहे. किमान फेब्रुवारीअखेरपर्यंत तरी कोरोनामुळे त्या भागातील खेळणी येणे अशक्य आहे. यामुळेच सध्या खेळणी बाजारात प्रचंड मंदीची स्थिती निर्माण झाली आहे.
-------------
क्रॉफर्ड बाजारातील दुकाने बंद
देशातील खेळण्यांची सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई आहे. मुंबईत सीएसटी जवळील क्रॉफर्ड बाजारात सर्वाधिक घाऊक व किरकोळ दुकाने आहेत. पण मागणीअभावी अनेक दुकाने ओस पडली आहेत. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. 'धंदाच होत नसेल तर दुकाने सुरू का ठेवायचे. त्याऐवजी वेगळा व्यवसाय केला तर थोडी तरी कमाई होईल. यामुळे अनेकांनी दुकाने बंद केली आहेत', असे येथील विक्रेते इरफान वली यांनी सांगितले.