म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
पावसाळा सुरू झाल्यापासून पनवेल-सायन मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच या मार्गावर प्रमाणापेक्षा जास्त अवजड वाहनांची संख्या चालू पावसाळ्या दरम्यान वाढली असल्याचे चित्र आहे. परिणामी आधीच खड्ड्यामुळे संथ असलेल्या वाहतुकीचा वेग अधिक मंदावत आहे. त्यामुळे किमान गर्दीच्या वेळेस सायन-पनवेल मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या दिपाली घोलप यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
सायन-पनवेल मार्गावर खड्डे पडणे ही बाब नित्याची झाली असून त्याला खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहने कारणीभूत आहेत. शिवाय या अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही दिसत आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झालेली दररोज सकाळी-संध्याकाळ पाहायला मिळत आहे. त्यातच शनिवार, रविवार तर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अवजड वाहनांनमुळे वाहतूक अगदी संथ गतीने होऊ लागली आहे. त्यामुळे कार्यालयात, कॉलेजमध्ये जाणाऱ्यांना आपला बराच वेळ या कोंडीत वाया घालवावा लागत आहे. त्यामुळे किमान गर्दीच्या वेळेस तरी अवजड वाहनांची वाहतूक रोखली, तर प्रवाशांचा अधिक वेळ या वाहतुकीत वाया जाणार नाही आणि वेळेत इच्छितस्थळी पोहोचता येऊ शकते. त्यामुळे पनवेल-सायन मार्गावर सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दोन्ही बाजूंच्या मार्गिकांवर अवजड वाहनांना बंदी आणावी, अशी मागणी घोलप यांनी केली. अशा आशयाचे निवेदन त्यांनी वाहतूक विभागाकडे दिले आहे.