उमेदवार ठरवण्यासाठी मतदान
म टा वृत्तसेवा, नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक २९ फेब्रुवारी रोजी होत आहे...
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक २९ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच कांदा-बटाटा बाजारातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, मात्र आता उमेदवारी देण्यासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत ज्याला अधिक मते मिळतील, तो व्यापारी कांदा-बाटाटा बाजारात अधिकृत उमेदवार म्हणून उभा राहणार आहे.
बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या पाच बाजारांपैकी फळ बाजारात सर्व व्यापाऱ्यांनी मिळून एकच उमेदवार उभा केल्याने संजय पानसरे हे एकच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अशाच पद्धतीने इतर बाजारांतून ही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी व्यापाऱ्यांचे एकमत होत नाही. कांदा-बटाटा बाजारात माजी संचालक अशोक वाळुंज यांच्याबरोबर कांदा-बटाटा आडत संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, आडत संघाचे इतर पदाधिकारी सुरेश शिंदे, मनोहर तोतलानी, राजेंद्र रासकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये अशोक वाळुंज यांनी इतकी वर्षे संचालकपदाचा कारभार सांभाळला आहे, मात्र त्याच्या काळात समाधानकारक कामे न झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे यावेळी संचालक म्हणून इतर कुणाला तरी संधी मिळावी, यासाठी इतर व्यापारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बाजारात पंचरंगी लढत होणार असल्याचेच पाहायला मिळत आहे.
आता व्यापाऱ्यांकडून कुणीतरी एकच व्यापारी प्रतिनिधी उभा राहावा, म्हणून अनेकांना माघार घेण्याचे आवाहन केले. माघार घेणार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उमेदवार उभा करण्यासाठी आणि माघार घेण्यासाठी म्हणून आडत महासंघाने आपल्या उमेदवारांच्या नावाने मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यापाऱ्यांना अधिक मते मिळतील, तो सर्वानुमते व्यापाऱ्यांचा अधिकृत उमेदवार ठरणार आहे. यासाठी या दोन दिवसांत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
दोघांचा विरोध
अशोक वाळुंज यांनी मात्र या मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले. बाजारात पाच संघटना आहेत, त्या सर्व संघटनांना बोलावून मतदान प्रक्रिया घ्या आणि ज्याला अधिक मते मिळतील, त्यांना उमेदवार म्हणून घोषित करा, अशी माझी भूमिका होती, असे वाळुंज यांनी सांगितले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश शिंदे यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे आता या विषयाचे काय होणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र दोन दिवसांत हा विषय निकाली काढला जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.