म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'मुंबईत आतापर्यंत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडूनही गेल्या वर्षीप्रमाणे पाणी तुंबून राहिलेले नाही. याची कल्पना मुंबईकरांना आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले किंवा साचले असे कुठेही दिसले नाही', असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पालिकेत केला.
आपत्कालीन नियंत्रण कक्षात पाहणीसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना 'मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मी आता कोणावरही आरोप करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. मुंबईकरांना त्रास होत असताना आपण आरोप करणे बरे नाही', असे स्पष्ट करीत त्यांनी मेट्रोच्या कामावर टीका करणे टाळले. मेट्रोच्या कामांमुळे यंदा मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता असून त्यास सरकार जबाबदार असेल, असा आरोप शिवसेनेच्या वतीने वारंवार करण्यात आला होता. सोमवारी मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडून अनेक भाग जलमय झाले. याबाबत
पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत उद्धव यांनी पालिकेचे कौतुक केले.
महापौरांचेही तेच मत
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. 'मुंबईत कुठेही पाणी तुंबले नव्हते, तर साचले होते', असा दावा त्यांनी केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्याचा समाचार घेत 'करून दाखवणाऱ्यांनी पळून दाखवलं' अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून व्यक्त केली
आशिष शेलार यांची टीका
भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी, महापौरांच्या दाव्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यानंतर काही मिनिटांतच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पालिका आपत्कालीन कक्षाला भेट दिली. उद्धव पालिकेत येणार असल्याची कल्पना फक्त पालिका आयुक्त अजय मेहता यांना दिली होती. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना कुणालाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. उद्धव यांनी कुठल्याही लवाजम्याशिवाय आपत्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील विविध घटनांची माहिती आयुक्तांकडून घेतली.