पनवेल : सध्या महाराष्ट्रात अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, भाजपमध्ये मेगाभरती सुरू असल्याचे सांगितले जाते, मात्र शेतकरी कामगार पक्ष मेगाभरती करीत नाहीत, तर आम्ही कार्यकर्ते घडवतो. त्यामुळे आमचा कार्यकर्ता पक्षाची एकनिष्ठ आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी पनवेल येथे केले. शेकापच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पनवेल शहरातील गुरुशरनम सोसायटीत शेकाचे नवे भव्यदिव्य पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले आहे. स्थलांतरित पक्ष कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजप आणि शेकापचा विचार दोन टोकांचा आहे, त्यांच्या आणि आमचा विचार कधीच एकत्र येणार नाही. अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचा विचार न करता भाजपमध्ये सध्या मेगाभरती केली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पाच आमदार पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आम्ही कार्यकर्ते घडवतो, त्यामुळे आमचे कार्यकर्ते, आमदार पक्षाशी प्रामाणिक आहेत. भाजपमध्ये मेगाभरती करून पक्ष वाढविला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. उरणमधून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील यांची उमेदवारी पाटील यांनी जाहीर केली.