म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोनाविरूद्ध लढाईतील महत्त्वाचे शस्त्र असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता वाढ झालेली असल्याने आपल्याला हा लढा आणखी खंबीरपणे लढायचा आहे. करोनाविरूद्धचे हे युद्ध आपण जिंकणारच, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.
करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांतील स्थितीचा फडणवीस यांनी आढावा घेतला. या जिल्ह्यांतील आमदार, खासदार, महापौर, पदाधिकारी भाजपच्या संवादसेतूमध्ये सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेत्यांनीही यात भाग घेतला. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मालेगाव, नगर, लातूर, अकोला इत्यादी ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी लोकोपयोगी वस्तुंचा पुरवठा करीत आहेत. आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने येणार्या काळात आपल्याला आणखी कठोर परिश्रम करायचे आहे. हे परिश्रम करताना स्वत:ला सुरक्षित राखत आणि अधिकाधिक काळजी घेत काम करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आरोग्यदूत, पोलिस आणि सफाई कामगार ही लढाई प्रत्यक्ष मैदानातून लढत असल्याने त्यांची काळजी घेणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे, असेही फडणवीस म्हणाले.