म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी संमत केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याचे बोधचिन्ह व 'आपली सेवा आमचे कर्तव्य' या घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. या कायद्याद्वारे अधिसूचित न झालेल्या सगळ्याच सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारी कामकाजासाठी लोकांना सरकारी कचेऱ्यांमध्ये जाण्याची अथवा वारंवार हेलपाटे मारण्याची गरज नाही. राज्यात २६ हजार आपले सरकार सेवा केंद्र सुरू झाले आहेत. आरटीएस महाराष्ट्र मोबाइल ॲप किंवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सरकारी सेवा उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या ३९ विभागांकडून ४९७ लोकसेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. यातील ४०३ सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे. आजतागायत ५ कोटी ४२ लाख ७८ हजार सेवांसाठी अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५ कोटी २७ लाख ४६ हजार ६४७ अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते. सेवा हक्क कायदा राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत संमत करण्यात आला. या कायद्याने जनतेला पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे. हे काम योग्य पद्धतीने होत आहे. या कायद्याचे बोधचिन्ह व घोषवाक्य सर्वोत्तम झाले आहे. सेवा हमी कायद्याचे पहिले आयुक्त क्षत्रिय चांगले काम करीत आहेत. जनतेला या कायद्याने त्वरित न्याय मिळवून देण्याचे काम सेवा हमी टीमने करावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या स्पर्धा
लोकसेवा हक्क कायद्याला अधिक लोकप्रिय करण्यासाठी बोधचिन्ह व घोषवाक्य तयार केले आहे. यासाठी नागरिकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या, यात उत्कृष्ट बोधचिन्ह नरेश अग्रवाल तर उत्कृष्ट घोषवाक्य हेमंत कानडे यांनी तयार केले. या दोघांना प्रत्येकी २५ हजारांचे पारितोषिक देण्यात आले आहे. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.