म. टा. वृत्तसेवा, डहाणू : मागील दोन दशकांत डहाणूच्या समुद्रकिनारी विणीच्या हंगामात सागरी कासवांनी अंडी घातल्याच्या घटना हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच होत्या. किनाऱ्यावर अवैध वाळूउपशात वाढ झाल्याने आणि रेतीचोरी करणारी वाहने रात्री थेट किनाऱ्यावर उतरवली जात असल्याने कासवांनी या किनाऱ्याकडे पाठ फिरवल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे होते. मात्र, डहाणूतील रेतीचोरी रोखण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने, या आदेशाची कडक अमलबजावणी झाल्यास येत्या विणीच्या हंगामात कासवे परतण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या सुमारे ३५ किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी कासवे सागरी अंडी घालण्यासाठी येत असल्याच्या नोंदी आहेत. फेब्रुवारी ते मार्च हा दक्षिण कोकणात, तर मे ते जुलै हा पालघर जिल्ह्यात कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम असतो. १९८१ साली ग्रीन सी टर्टलने येथे अंडी घातली होती. तसेच २००३-०४ साली चिखले गावात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ४८० पिल्लांना समुद्रात सोडण्यात कासव मित्रांना यश आले होते. विणीसाठी येणाऱ्या कासवांना पोषक वातावरण, शांतता आणि सुरक्षिततेची आवश्यकता असते. वाढत्या रेतीचोरीमुळे वाळूची पठारे, मर्यादावेल, छोटी झुडपे नाहीशी झाली. तसेच रेतीची वाहतूक करणारी वाहने रात्रभर किनाऱ्यावर फिरत असल्याने शांततेचाही अभाव होता. त्यामुळे कासवे माघारी फिरल्याची शक्यता वर्तवली जाते. हे असुरक्षित वातावरण हे कासवांनी डहाणूच्या किनाऱ्यांकडे पाठ फिरवण्याचे प्रमुख कारण समजले जाते. महसूल मंत्र्यांनी डहाणूतील रेतीचोरी रोखण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे अधिवेशनात उत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे जर रेतीचोरीला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले, तर हा भाग पुन्हा कासवांसाठी नंदनवन ठरेल असा विश्वास कासवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या सुमारे ३५ किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी कासवे सागरी अंडी घालण्यासाठी येत असल्याच्या नोंदी आहेत. फेब्रुवारी ते मार्च हा दक्षिण कोकणात, तर मे ते जुलै हा पालघर जिल्ह्यात कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम असतो. १९८१ साली ग्रीन सी टर्टलने येथे अंडी घातली होती. तसेच २००३-०४ साली चिखले गावात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ४८० पिल्लांना समुद्रात सोडण्यात कासव मित्रांना यश आले होते. विणीसाठी येणाऱ्या कासवांना पोषक वातावरण, शांतता आणि सुरक्षिततेची आवश्यकता असते. वाढत्या रेतीचोरीमुळे वाळूची पठारे, मर्यादावेल, छोटी झुडपे नाहीशी झाली. तसेच रेतीची वाहतूक करणारी वाहने रात्रभर किनाऱ्यावर फिरत असल्याने शांततेचाही अभाव होता. त्यामुळे कासवे माघारी फिरल्याची शक्यता वर्तवली जाते. हे असुरक्षित वातावरण हे कासवांनी डहाणूच्या किनाऱ्यांकडे पाठ फिरवण्याचे प्रमुख कारण समजले जाते. महसूल मंत्र्यांनी डहाणूतील रेतीचोरी रोखण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे अधिवेशनात उत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे जर रेतीचोरीला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले, तर हा भाग पुन्हा कासवांसाठी नंदनवन ठरेल असा विश्वास कासवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.