अ‍ॅपशहर

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, हल्लाबोल करत १२ हजार महिलांचा मोर्चा धडकला

Palghar Mahila Morcha News : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज हजारो महिलांनी वेढा घातला. यामुळे प्रशासन आणि पोलिसांची मोठी दमछाक झाली. विविध मागण्यासाठी महिलांनी हा मोर्चा काढला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2023, 5:41 pm
पालघर : रेशन, रोजगार, पाणी, आरोग्य या महिलांच्या ज्वलंत मागण्या घेऊन आज जनवादी महिला संघटनेच्या ठाणे-पालघर जिल्ह्यातील तब्बल १२,००० महिलांचा प्रचंड मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाला ५०० ते १००० महिला येतील या हिशेबाने पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. पण महिलांची पाच किलोमीटर लांबीची रांग बघून पोलिसांचा बंदोबस्त कमी पडला. २०१४ मध्ये पालघर जिल्हा नव्याने स्थापन झाला. त्यानंतरच्या १० वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला महिलांचा हा सर्वात भव्य मोर्चा हे सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Palghar Morcha News
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा, हल्लाबोल करत १२ हजार महिलांचा मोर्चा धडकला


रोख नको, धान्य हवे : रेशन-रोजगार -पाणी-आरोग्य-शिक्षण आमच्या हक्काचे, रेशन योजना सार्वत्रिक करा अशा दमदार घोषणा देत महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून गेल्या. कोणीही प्रमुख अधिकारी मोर्चाला सामोरे न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सबंध कार्यालयालाच वेढा घातला. त्यानंतर लगेच हालचाल होऊन उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला भेटायला बोलावले. या चर्चेसाठी स्वतः आमदार विनोद निकोले हजर होते. सुमारे अडीच तास चर्चा झाली आणि पुढील निर्णय घेण्यात आले.

VIDEO | लाडक्या शिक्षकाची १४ वर्षांनी बदली, गावकऱ्यांकडून मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर
१. रेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व तालुक्यांच्या कॅम्पच्या तारखा ठरवण्यात आल्या. त्या दिवशी अधिकारी आणि जमसंच्या कार्यकर्त्या देखील हजर राहतील

२. पाणी, मनरेगा आणि आरोग्य हे प्रश्न गंभीर आहेत. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी तारीख देऊन विशेष बैठक लावतील

गावागावात महिलांनी भरलेल्या हजारो फॉर्म्सच्या आधारावर हे निर्णय झाले. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. किसान सभा, सीटू, डीवायएफआय या भ्रातृभावी संघटनांनी हा मोर्चा यशस्वी केला.

अवघ्या ५ महिन्यात संसारगाठ सुटली; पती निधनानंतर पत्नीच्या मनाचा मोठेपणा; ११ जणांना नवं जीवन
शिष्टमंडळात 'जमसं'च्या जिल्हा सचिव लहानी दौडा, जिल्हा अध्यक्ष प्राची हातिवलेकर, जिल्हा खजिनदार सुनिता शिंगडा, सविता डावरे, संगीता ओझरे, लता घोरखाना, मेरी रावते, ताई बेंदर, गिरजी कानल, रमा तारवी, आरती डावरे, संगीता खांजोडे, मनीषा बुधर, सुनंदा पाटील, संजना सुर्वे, निकिता काकरा, कमल वळंबा अशा अनेक नेत्यांचा समावेश होता.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आता उद्या म्हणजे २६ मे रोजी 'जमसं'चा ठाणे जिल्ह्यातील तालुक्यांतील महिलांचा वेगळा मोर्चा काढला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज