अ‍ॅपशहर

‘... तर आपण एक ‘मृत समाज’ बनू’

म टा प्रतिनिधी, पुणे'लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे हवेच...

Maharashtra Times 29 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे हवेच. भारतासारख्या देशात जर हा संवैधानिक हक्क जपला गेला नाही तर, आपण शब्दशः एक 'मृत समाज' (डेड सोसायटी) बनून राहू. हे घडू द्यायचे नसेल तर, आपण आजच सजग व्हायला हवे. लेखक-कलाकारांचे विचारस्वातंत्र्य जपायलाच हवे. आज देशभरात अनेक लेखकांना धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या आवाजांना संरक्षण मिळणे हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. या देशात एकही मुक्त विचार, मुक्त आवाज हिंसेच्या बळावर दडपला जाऊ नये, यासाठी आपण आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढत उभे राहूया... त्यांच्या बाजूने बोलत राहूया' अशा शब्दांत ख्यातनाम लेखिका तसेच स्तंभलेखिका शोभा डे यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले.

गेल्या पाच वर्षांपासून पुणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्रजी साहित्याशी संमुख करणाऱ्या आणि विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी देणाऱ्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या यंदाच्या ६ व्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी डे बोलत होत्या. 'पुण्यासारख्या शहराने तर एकेकाळी साहित्यातून बंडाचा आवाज बुलंद केला होता. देशातील वैचारिक क्रांतीची बीजे इथे रोवली होती. तसे साहित्यिक क्रांतिपर्व पुन्हा एकदा यावे,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

इटलीचे भारतातील राजदूत एच. इ. लॉरेंझो एंगेलिओनी, भरत अगरवाल, राहुल कराड, महोत्सवाच्या संचालक डॉ. मंजिरी प्रभू आदी या वेळी उपस्थित होते. तर, खासदार तसेच लेखक शशी थरूर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून या महोत्सवास आपला शुभेच्छासंदेश दिला.

पुस्तकांविषयी बोलताना डे म्हणाल्या, 'पुस्तके ही नेहमीच माझे सर्वोत्तम मित्र राहिले आहेत. आमच्या लहानपणीसुद्धा बाबांनी अनेकदा खेळणी हाती न देता आम्हा भावंडांच्या हाती वेगवेगळी पुस्तके ठेवली. हाती मोजके पैसे असले तरी ते आमच्यासाठी पुस्तके खरेदी करून आणत. आम्ही वाचावे, अशी त्यांची मनोमन इच्छा असे. त्यातूनच माझी आणि पुस्तकांची मैत्री वाढत गेली. त्यातून एक नवेच जग माझ्यापुढे उलगडत गेले. अनेकानेक पुस्तकांची दुनिया माझे अनुभवविश्व सतत विस्तारत गेली... सध्या मी 'कृष्णा'च्या प्रतिमेच्या, त्याच्या उत्कट व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात आहे. केवढे अफाट आवाक्याचे व्यक्तिमत्त्व होते ते. अहाहा! माझ्यापुरते म्हणाल तर मला कृष्ण आणि अर्थातच 'महाभारत' ही खूप महत्त्वाची साहित्यकृती वाटते.'

यंदाचा महोत्सव 'कुटूंब - समाजाचे केंद्रस्थान' या संकल्पनेवर आधारित आहे. यंदा महोत्सवात भारतातील साहित्यिक-कलाकारांच्या सोबतच न्यूझीलंड, अमेरिका, दुबई, स्वित्झर्लंड अशा विविध देशांतील साहित्यिकांना ऐकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. थोर ब्रिटिश लेखक चार्ल्स डिकन्स यांच्या स्मृतींना वाहिलेला एक विभागही यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.

.....

मी आवर्जून सांगेन, पाचच मिनिटे का असेना, पण दररोज एखादेतरी पुस्तक वाचायला सुरुवात करा. तुम्ही बघाच, वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही थांबूच शकणार नाही. एक पुस्तक तुम्हांला त्याच्या प्रेमात पाडू शकते. ते तुम्हाला शहाणपण देते. एक माणूस म्हणूनही घडवते.

- शोभा डे

.....

भारतात आल्यानंतर माझ्या कानांवर पडलेले 'वसुधैव कुटुंबकम' हे शब्द मला विशेष भावले. त्यांचा अर्थ आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः दोन देशांतील राजनैतिक संबंध जपण्यात मला याचा संदर्भ अधिकच महत्त्वाचा वाटतो. त्यातून उभय राष्ट्रांत एक सकारात्मक नात्याचा पूल उभारला जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जगभरातील कुटुंबव्यवस्था जपण्यातही त्याचा उपयोग आपण करुया.

- एच. ई. लॉरेंझो एंगेलिओनी

.....

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज