अ‍ॅपशहर

१३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला मिळाले भारतीय नागरिकत्व

१३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. अजून ४ विदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं.

महाराष्ट्र टाइम्स 6 Jan 2021, 2:22 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः पुण्यात ‘लाँग टर्म व्हिसा’वर राहणाऱ्या १३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले असल्याने या १४ नागरिकांचे भारतात कायमचे राहण्याचे स्वप्न साकार होऊ शकले आहे. आणखी चार परदेशी नागरिकांना शपथ देण्यात आली असून, कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना भारतीय नागरिकत्त्व मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, राजाराम टेकाळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian citizenship
१३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला मिळाले भारतीय नागरिकत्व


हे नागरिक ‘लाँग टर्म हिसा’वर पुण्यात रहात होते. त्यांनी भारतीय नागरिकत्त्व मिळण्यासाठी अर्ज केले होते. याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. नागरिकत्त्व देण्यापूर्वी संबंधित नागरिकांना सात वर्षे भारतात राहावे लागते; तसेच नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवावा लागत नाही. या नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेण्यात येते. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भारतीय नागरिकत्त्व देण्यात येत असते. त्यानुसार १३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. नागरिकत्त्व मिळालेल्या या १४ जाणांना आता प्रत्येकवेळी पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्वच देण्यापूर्वी त्यांना भारतीय राज्यघटनेचे पालन करण्याबाबतची शपथ देण्यात येते. त्यानुसार चार पाकिस्तानी नागरिकांना शपथ देण्यात आली आहे. या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आतापर्यंत १३६ जणांना भारतीय नागरिकत्व

जिल्हाधिकारी यांच्याकडून परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३६ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात येतात. आणखी काही परदेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्त्व मिळण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज