म. टा. प्रतिनिधी, पुणे
रक्तातून होणाऱ्या विषाणूंच्या संक्रमणामुळे (ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन-टीटीआय) देशात गेल्या वर्षभरात १३००हून अधिक रुग्णांना 'एचआयव्ही'चा संसर्ग झाला असून, राज्यात एचआयव्ही'ची लागण झालेल्यांची संख्या १६९ असल्याची धक्कादायक माहिती 'राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासोबतच राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये 'न्यूलिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेक्नॉलॉजी' या (नॅट) आधुनिक रक्ततपासणीवर भर द्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
दर वर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी ऐच्छिक आणि नियमित रक्तदानाला उत्तेजन देण्यासाठी जनजागृती केली जाते. या निमित्त जनकल्याण रक्तपेढीतर्फे शहरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रह्मण्यम आणि 'मेडिकल सायंटिफिक अफेअर्स'चे प्रमुख डॉ. संदीप सेवलीकर यांनी सुरक्षित रक्त संक्रमणाविषयी चर्चा केली. देशभरात सुमारे अडीच हजार रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी अवघ्या दोन ते तीन टक्के रक्तपेढ्या 'नॅट'सारखी आधुनिक रक्त तपासणी पद्धत अवलंबत आहेत. राज्यातील बहुतांश रुग्णालये, रक्तपेढ्या अद्याप या पद्धतीपासून चार हात लांब आहेत. त्यामुळे रुग्ण संसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. या पद्धतीमुळे एचआयव्ही, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी अशा विषाणूंचे थेट निदान केले जाते, असे मत चर्चेतून पुढे आले. दान केलेल्या रक्तातील संसर्ग शोधण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, असे डॉ. सेवलीकर यांनी सांगितले. या पद्धतीमुळे ७० महिन्यांत १११ जणांचे आयुष्य 'टीटीआय'पासून वाचवू शकलो, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांसाठी रक्त तपासणीची आधुनिक पद्धत उपलब्ध झाली पाहिजे, असे मत डॉ. सुब्रह्मण्यम यांनी मांडले.