अ‍ॅपशहर

उद्योग उत्पादनात ‘येरवडा’ पहिले

राज्यातील कारागृहांत सुरू असलेले उद्योगधंदे व शेती यातून कारागृह विभागाने तब्बल २७ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले आहे. त्यापैकी खर्च जाऊन दोन कोटी साठ लाख रुपयांचा नफा या विभागाला मिळाला आहे.

Authored byShrikrishna kolhe | महाराष्ट्र टाइम्स 8 Nov 2020, 3:06 pm
पुणे : राज्यातील कारागृहांत सुरू असलेले उद्योगधंदे व शेती यातून कारागृह विभागाने तब्बल २७ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले आहे. त्यापैकी खर्च जाऊन दोन कोटी साठ लाख रुपयांचा नफा या विभागाला मिळाला आहे. राज्यात कारागृहांतील उद्योगांमध्ये सर्वाधित उत्पादन येरवडा कारागृहाने घेतले, तर शेतीमध्ये पैठण कारागृहाने पहिला क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 crore rupees industrial production taken by yerwada jail department in the state
उद्योग उत्पादनात ‘येरवडा’ पहिले


राज्यातील कारागृहांच्या माहितीचा लेखाजोखा मांडणारा २०१८-१९ या वर्षाचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कारागृहातील कैद्यांची क्षमता, प्रत्यक्ष कैदी, शिक्षा भोगताना कैद्यांना दिली जाणारी कामे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यात सध्या एकूण ६० कारागृहे आहेत. मार्च २०१९ अखेरपर्यंत या कारागृहांत कैद्यांची संख्या ३६ हजार ३६६ असून, त्यापैकी शिक्षा झालेले नऊ हजार आठ कैदी आहेत. त्यापैकी पाच हजार ६९४ कैद्यांना उद्योगांतून रोजदार देण्यात आला, तर एक हजार ५२ कैद्यांना शेतीमधून काम देण्यात आले.

राज्यातील कारागृहात शिक्षा झालेल्या कैद्यांना सुतारकाम, शिवणकाम, लोहारकाम, यंत्रमाग, हातमाग, बेकरी, चर्मकला, धोबीकाम, कागद कारखाना, रंगकाम, रसायन उद्योग, मोटार सर्व्हिसिंग, मूर्तीकाम अशा उद्योगांच्या माध्यमातून काम दिले जाते. या ठिकाणी काम करणाऱ्या कैद्यांना त्यांच्या पात्रतेनुसार म्हणजेच कुशल कैद्याला दिवसाला ६१, अर्धकुशल कैद्यांना ५५ आणि अकुशल कैद्याला ४४ रुपये पगार दिला जातो. कारागृहात सुरू असलेल्या उद्योगांतून कारागृह विभागाने २०१८-१९मध्ये २३ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. यातून सर्व खर्च जाऊन कारागृह विभागाला ९८ लाखांचा नफा मिळाला. राज्यात सर्वाधिक उत्पादन येरवडा कारागृहात ( पाच कोटी ८१ लाख रु.) घेण्यात आले, तर त्यानंतर नाशिक (पाच कोटी ४३ लाख रु.), नागपूर (४ कोटी ६ लाख) येथील कारागृहांनी उत्पादन घेतले.

(क्रमश:)

शेतीतून एक कोटी ६५ लाखांचा नफा


राज्यातील २९ कारागृहांच्या ३२७ हेक्टर क्षेत्रात शेती केली जाते. या शेतीमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, ऊस, भात, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, केळी अशा पिकांचे उत्पादन घेतले जाते. २०१८-१९मध्ये कारागृह विभागाने शेतीमधून ४ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. त्यामधून सर्व खर्च जाऊन एक कोटी ६५ लाखांचा नफा मिळाला आहे. शेतीमध्ये सर्वांत जास्त उत्पादन पैठण खुल्या कारागृहाने (७५ लाख रु.) घेतले आहे. त्यानंतर शेती उत्पादनात विसापूर व येरवाडा खुल्या कारागृहाचा क्रमांक लागतो.


कारागृहांचे उत्पादन

(वर्ष २०१८-१९)

उद्योग : ~२३ कोटी ९ लाख

शेती : ~४ कोटी ९ लाख

प्रमुख कारागृहांचे

उद्योगातील उत्पादन

कारागृह उत्पादन

येरवडा ~५ कोटी ८१ लाख

नाशिक ~५ कोटी ४३ लाख

नागपूर ~४ कोटी ६ लाख

कोल्हापूर ~३ कोटी १२ लाख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज