म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-लोणावळा मार्गावर गेल्या ४१ वर्षांपासून सुरू असलेल्या लोकल सेवेचा अद्याप विस्तार होऊ शकलेला नसलेला नसून, संपूर्ण दिवसभर विनाखंड सेवा मिळण्याचीही प्रतीक्षाच करावी लागत आहे. दरम्यान, सध्या उपलब्ध असलेल्या लोकल गाड्यांद्वारे दुपारच्या टप्प्यात शिवाजीनगर ते तळेगाव आणि तळेगाव ते लोणावळा या टप्प्यात सेवा देणे शक्य होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
पुणे-लोणावळा-पुणे या मार्गावर पहाटे पावणेपाच वाजता पुण्याहून पहिली लोकल सुटते. तर, लोणावळ्याहून पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी लोकल सुटते. त्यानंतर साधारणपणे एक तासाच्या अंतराने सकाळच्या टप्प्यात गाड्या सेवेत असतात. मात्र, पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या गाड्या दुपारी एक ते तीन या वेळेत बंद असतात. तसेच, लोणावळ्याहून पुण्याकडे येणाऱ्या गाड्या सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत बंद असतात. प्रवाशांच्या संख्येनुसार या दोन ते अडीच तासांच्या कालावधीतही लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
\B
लोकल वेळापत्रकाच्या फेररचनेची गरज\B
माधवराव शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री असताना ११ मार्च १९७८ साली पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू झाली. त्या वेळी पुणे विभागाला देण्यात आलेल्या रेकद्वारेच अलीकडील काळापर्यंत प्रवासी सेवा दिली जात होती. त्यात काही महिन्यांपूर्वी दोन ते तीन रेकची भर पडली आहे. मात्र, तो रेक देखील मुंबईमध्ये पाच वर्षे वापरल्यानंतर पुणे विभागाला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढलेली नाही. वास्तविक, लोकल सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा कायापालट झाला आहे. त्यामुळे या लोकलच्या मार्गांवरील प्रवासी संख्याही वाढली आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
………………….............
प्लॅटफॉर्म मिळणे शक्य?
लोकल सेवा विनाखंड सुरू करणे शक्य नाही. कारण, दुपारच्या वेळेत पुणे रेल्वे स्थानकात लोकलसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यास शिवाजीनगरहून या गाड्या सोडणे शक्य होईल. त्याचा कोणत्याही लांब पल्ल्याच्या गाडीला फटका बसणार नाही, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
…………...............
रेल्वेच्या मुंबई विभागात तीन हजारांहून अधिक लोकल आहेत. तसेच, रविवारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या पनवेल-पेण मार्गावरही डेमू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि पुण्याच्या लोकसंख्येचे व लोकलच्या संख्येचे गुणोत्तर तपासल्यास त्याचे प्रमाण खूपच व्यस्त दिसून येते. त्यामुळे पुण्याला अधिक गाड्या मिळण्याबरोबरच, किमान दर अर्ध्या तासाला लोकल धावली पाहिजे.
- हर्षा शहा (अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप)
…………….................