महापालिकेच्या आढाव्यातून दिलासादायक बाब समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या महिन्याभरात करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही शहरातील साडेचारशे नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यापैकी एकाही नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झालेला नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लशीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर करोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या किती, याचा शोध घेण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले होते. महापालिकेनेही यापूर्वीच अशा व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरात करोनाची चाचणी करण्यासाठी येणाऱ्यांपैकी किती जणांचे लसीकरण पूर्ण झाले, याचा आढावा घेण्यात येत होता. करोना चाचणी करणाऱ्या सरकारी प्रयोगशाळांबरोबरच खासगी प्रयोगशाळांनाही ही माहिती गोळा करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही डोस झालेली एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची माहिती त्वरित महापालिकेला कळवावी, असे सक्त आदेश खासगी प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या माहिनाभरात दुसरी लस घेऊनही बाधित झालेल्या साडेचारशे व्यक्तींची नोंद महापालिकेकडे झाली आहे.
नियमांकडे दुर्लक्षाने बाधा ?
करोनाचा संसर्ग अद्याप कायम आहे. शहरात आजही अनेक बाधित आहेत. दोन डोस घेतल्यावरही नागरिक बाधित आढळत आहेत. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर करोना होणार नाही, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे, सुरक्षित वावर, मास्कचा वापर आदी प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अशा व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
बाधितांची लक्षणे सौम्य
करोना प्रतिबंधक लशीचे एक किंवा दोन्ही डोस घेतल्यानंतर करोना होणारच नाही, असे नाही. असा दावा लस उत्पादकांनीही केलेला नाही. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर करोनाची तीव्रता नक्कीच कमी होते. बहुतांश बाधितांना सौम्य लक्षणे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यताही अतिशय कमी असते, हेच दिसून येते.
वरिष्ठ अधिकारी
आरोग्य विभाग पुणे महापालिका