लोगो- मटाविशेष
Shrikrishna.Kolhe
@timesgroup.com
@ShrikrishnaMT
पुणे : दिव्य शक्तीच्या आधारे भूत उतरवितो, पैशांचा पाऊस, अलौकिक शक्ती, गुप्तधन, नग्नपूजा, नरबळी अशा प्रकारची बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आतापर्यंत ५५० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाच ते सहा गुन्ह्यात आरोपींना शिक्षादेखील झाल्या असून अनेक खटले कोर्टात सुरू आहेत. या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असली, तरी पोलिसांची चौकशी आणि बदनामीच्या भीतीने तीनपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन राज्य सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर केले. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'अंनिस' विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटका देणे, जबरदस्तीने मानवी विष्ठा तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तीचा दावा करून महिलांना विवस्त्र पूजेस बसण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी घटनांमध्ये जादूटोणाविरोधी काद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यातील पहिला गुन्हा विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार ५५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, आतापर्यंत पाच ते सहा गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षादेखील झाली आहे. यामध्ये सांगली, चाळीसगाव, नाशिक येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तक्रादारांना तक्रार दाखल करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाते. तसेच, नंतरही गुन्ह्यांचा पाठपुरावा केला जातो, अशी माहिती 'अंनिस'चे सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली.
'अंनिस'च्या साह्याने ४५० गुन्हे दाखल
'अंनिस'कडून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. पण, विविध कारणांमुळे अद्यापही अनेकजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. बऱ्याच घटनांमध्ये बदनामी होण्याच्या भीतीने अनेकजण तक्रार करत नाहीत. पोलिसांनादेखील अद्याप या कायद्याची पूर्ण माहिती नाही. लीगल टीमचा अभिप्राय घेऊन गुन्हा दाखल करण्यास वेळ लावला जातो. तसेच, तक्रारदारांना कधीकधी पोलिसांकडून चांगले सहकार्य मिळत नाही. तुम्हाला कळत नव्हते का, उशीरा का आलात अशा प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे नागरिक तक्रारीसाठी येत नाहीत. लैंगिक छळाच्या घटनांमध्ये बदनामी होण्याच्या भीतीने महिला पुढे येत नाहीत. मुलीचे लग्न झाले नसेल, तर तक्रार केल्यानंतर पुढे लग्न होणार नाही, या भीतीने तक्रार केली जात नाही. तरीही, 'अंनिस'कडून नागरिकांमध्ये जनजागृती करून गुन्हे दाखल करण्यास नागरिकांना सांगितले जाते. राज्यात दाखल झालेल्या ५५० गुन्ह्यांपैकी ४५० गुन्ह्यांत 'अंनिस'चे कार्यकर्ते सोबत होते. तर, १०० गुन्हे थेट तक्रारदारांच्या सांगण्यावरून झाले आहेत, असे मिलिंद देशमुख यांनी सांगितले.
जादूटोणाविरोधी कायदा नसताना फसवणूक व इतर कायद्यांनुसार गुन्हे दाखल होत होते. त्यामुळे आरोपींवर विशेष कारवाई होत नव्हती. पण, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कठोर कारवाईला सुरुवात झाली. जादूटोणाविरोधी एक सामाजिक वातावरण निर्माण झाले. हा गुन्हा म्हणजे धर्माचे अंग नसून बुवाबाजीच्या विरोधात असल्याचे नागरिकांना समजू लागले. बुवाबाजी ही अंधश्रद्धा नसून तो गुन्हा असल्याचे सिद्ध झाले. नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.
मिलिंद देशमुख, सचिव, 'अंनिस'