अ‍ॅपशहर

'ए' फॉर अमेठी, 'बी' फॉर बारामती, स्मृती इराणींचे सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष आव्हान

पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. इराणी यांनी आपल्या वक्तव्यातून पुढील मोर्चा हा बारामतीकडे वळवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 17 May 2022, 12:16 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे : 'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला अमेठीतून लढण्याची संधी दिली आणि मी राहुल गांधींचा पराभव करू शकले. आता 'ए' फॉर अमेठी आणि 'बी' फॉर बारामती होते, हे शहा जाणतात,' असे सांगून केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पुढचा मोर्चा बारामतीकडे वळवणार असल्याचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम smriti irani pune visit challenges to supriya sule
'ए' फॉर अमेठी, 'बी' फॉर बारामती, स्मृती इराणींचे सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष आव्हान


शिवानंद द्विवेदी लिखित व ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर यांनी अनुवादित केलेल्या 'अमित शहा आणि भाजपची वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाचे आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

'अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप मशिन नाही, तर एक मिशन आहे. हेच मिशन हाती घेऊन आम्ही राहुल गांधींच्या अमेठीच्या घरात घुसलो. लोकशाहीद्वारे लढलो आणि त्यांचा पराभव केला. आणि पुन्हा पुन्हा हेच करीत राहू. अमित शहा यांनी आदेश दिला, तर जे अमेठीत घडले ते बारामतीतही होईल. त्यांचा आदेश शिरसावंद्य,' असे म्हणत स्मृती इराणींनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांना आव्हान दिले. 'अमित शहा यांना मिळत असलेले यश पाहण्याआधी त्यांनी केलेला संघर्ष लक्षात घ्या. ९० दिवस तुरुंगात राहणारा, दोन वर्षे घरापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीने आपली विचारधारा आणि संघटनेबद्दलची आस्था कधी सोडली नाही. त्यांच्या यशस्वी होण्यामागे हाच संघर्ष कारणीभूत आहे. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला लक्षात ठेवून निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन केल्याने हे यश पाहायला मिळत आहे,' असेही इराणी म्हणाल्या.

'शहराची संस्कृती बिघडवू नका, अन्यथा...'

स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी थेट आव्हान दिले. 'उठसूठ आमच्या नेत्यांच्या दौऱ्यांच्या वेळी आंदोलने करू नका, हे वेळीच थांबवा; अन्यथा आम्हीही गप्प बसणार नाही,' असा इशारा पाटील यांनी दिला. 'आंदोलने करायचीच असतील, तर ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करा. नाही तर मग काँग्रेस, 'राष्ट्रवादी'चे नेतेही सारखे पुण्यात येतच असतात. मग जे होईल त्याला आम्ही जबाबदार नसू,' असे पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज