म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ मदुराई एक्स्प्रेसला शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या अपघात झाल्याने मध्य रेल्वेची मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मदुराई एक्सप्रेसच्या लगेजबोगीच्या मागील बोगीमध्ये मागील बंकर (इंजिन) घुसले. याच ठिकाणी आतापर्यंत रेल्वेचे तीन अपघात झाले असून, या वर्षातील हा दुसरा अपघात आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून निघालेली मदुराई एक्स्प्रेस खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ आली असता गाडीच्या बंकरची (इंजिन) लगेज बोगीला जोरात धडक बसली. यामुळे लगेज बोगीचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या डाऊन लोहमार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. मदुराई एक्स्प्रसेची अपघातग्रस्त बोगी व बंकर (इंजिन) युद्धपातळीवर काम करून हटविण्यात आले. त्यानंतर मार्गाचे दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले.
यामुळे पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-कर्जत व कर्जत-पुणे शटल, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस व मुंबई-पुणे, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
खंडाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट क्रमांक २९ येथे आतापर्यंत रेल्वेचे तीन अपघात झाले आहेत. यामध्ये दोन मालगाड्यांचा समावेश आहे. सात सप्टेंबर २०१७ रोजी याच ठिकाणी मालगाडीचे सात ते नऊ डबे रुळावरुन घसरून मोठा अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा दोन दिवस विस्कळित झाली होती. मध्य रेल्वेच्या या मार्गावरील खंडाळा रेल्वेस्थानक व मुंबईहून येताना शेवटच्या बोगद्यादरम्यानच्या मार्गावर सातत्याने घडणाऱ्या रेल्वे अपघातांची कारणे रेल्वे प्रशासनाला शोधावी लागणार आहेत. यामागे मानवी चुका वा मार्गातील तांत्रिक चुका यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारणमीमांसा करण्याची गरज आहे. मुंबईहून पुण्याला जाताना मध्यरेल्वेचा मुंबई-पुणे लोहमार्ग हा कर्जतनंतर घाटमाथा व डोंगर दऱ्यातून गेलेला आहे. चढणीची अवघड व नागमोडी वळणाचा हा मार्ग आहे. घाटमाथा व डोंगरदऱ्यातून रेल्वे चालविणे मोटरमनपुढे एक मोठे आव्हानच आहे. तसेच पावसाळा असो किंवा इतर कोणताही ऋतु, या घाटमाथा परिसरात सातत्याने नैसर्गिक व भौगोलिक घडामोडी घडत असतात. या घडामोडींमुळे होणारे परिणाम व हालचालींवर रेल्वे प्रशासनाला लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपाययोजना राबवून त्या अंमलात आणल्या पाहिजेत.