कैद्यांना भेटण्यासाठी वकिलांना येणाऱ्या अडचणी, जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या असुविधा याकडे लक्ष वेधण्यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडून नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेलमधील कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी आता वकिलांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वकील सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेतच कैद्यांना भेटू शकतात. यापूर्वी जेलमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी दिवसातून दोनदा वेळ देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ सकाळची केल्यामुळे ती अडचणीची ठरू लागली आहे.
- वंदना घोडेकर
जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे वकीलपत्र घेण्यासाठी तसेच त्यांच्या बाजूने कोर्टात लढत असताना वकिलांना कैद्यांची जेलमध्ये जाऊन भेट घ्यावी लागते. राज्यातील बहुतांश जेलमध्ये सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे कैद्यांना सुविधा मिळत नाहीत. तसेच उपलब्ध असलेल्या सुविधाही पुरेशा नाहीत. कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या वकिलांना आणि कैद्यांच्या नातेवाइकांनाही याचा सामना करावा लागतो. मुलाखत घेण्याची प्रकिया क्लिष्ट असल्यामुळे तसेच येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकिलांनी हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने कैद्यांच्या भेटीसाठी स्वतंत्र नियमावलीच परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. कैद्यांची भेट घेण्यासाठी यापूर्वी नियमावली नव्हती. या याचिकेमुळे ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र कैद्यांना भेटण्यासाठी देण्यात आलेली वेळ पुरेशी नाही असे वकिलांचे, तसेच महिला वकिलांचे म्हणणे आहे. येरवडा जेलचा विचार केला; तर सध्या येथे तीन हजाराहून अधिक कैदी आहेत. यामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेले आणि न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्यांचा समावेश आहे.
कैद्यांच्या बाजूने लढताना त्यांच्या केससंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेकदा वकिलांना जेलमध्ये कैद्यांची मुलाखत घ्यावी लागते. मात्र मध्यंतरी या संदर्भात जेल प्रशासनाकडून काही बदल करण्यात आले होते. त्याचा वकिलांना मुलाखत घेताना त्रास होत होता. मुलाखत घेण्यासाठी येताना वकिलांनी ड्रेसकोड पाळावा, वकिलपत्राची कॉपी त्यांच्याबरोबर असावी, ओळखपत्र असावे, तसेच कैद्याची सही वकिलपत्रावर असावी अशा काही सूचना जेल प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या बदलांमुळे वकिलांना अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुण्यातील जनअदालत संघटना, अॅड. इब्राहिम शेख आणि आरोपी असलेला गणेश पवार यांच्यामार्फत येरवडा जेल प्रशासनाविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दाखल करताना पुण्यातील ३०० वकिलांच्या सह्यांचे निवेदन जोडण्यात आले होते. हायकोर्टात अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत मुलाखत घेताना वकिलांना येणाऱ्या अडचणींबरोबरच जेलमध्ये असलेल्या कैद्यांना मिळणाऱ्या असुविधा, त्यांच्या अडचणी, महिला जेलमध्ये असलेल्या महिलांच्या अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील जेलमध्ये कैद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार हायकोर्टाकडून काही निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कैद्यांना भेटण्यासाठी देण्यात येणाऱ्या वेळा, भेटण्यासाठी कोणत्या सुविधा असाव्यात याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता मुलाखत घेताना संबंधित बदल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केलेले अॅड. इब्राहिम शेख यांनी, वकिलांना मुलाखत घेण्यासाठी देण्यात आलेली एक वेळ मात्र अडचणीची ठरत असल्याचे सांगितले. याचिका दाखल करताना आपण इतर मुद्द्यांकडेही लक्ष वेधले होते. मात्र दिवसातून दोनदा भेटण्यासाठी असलेली वेळ ही आता सकाळचीच करण्यात आली आहे. लांबून येणाऱ्या लोकांना, महिलांना ही वेळ अडचणीची ठरते आहे. सकाळच्या वेळी मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वकिलांची संख्या अधिक असते. तसेच कैद्यांना भेटण्यासाठी मिळणारा वेळ कमी मिळतो आहे. कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी जेलमध्ये आधी अर्ज द्यावा लागतो. तिथे सध्या दोन कम्पुटरवर नोंदणी केली जाते. याठिकाणी आणखी एक कम्पुटर आणि कर्मचारी मिळावा आणि ही वेळ वाढवून दुपारीही करण्यात यावी यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार आहोत, असे अॅड. इब्राहिम शेख यांनी नमूद केले.
याचिकेनुसार आपण कैद्यांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, मुलाखत घेण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमावली याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. कैद्यांची भेट घेण्यासाठी आता एकच वेळ देण्यात आली आहे. पुढील काही दिवसात यामुळे नेमक्या काय अडचणी येतात. ही वेळ योग्य आहे हा, हे पाहून पुढील गोष्टींसाठी प्रयत्न करू, असे जनअदालत संघटनेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे सांगतात.
केवळ यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल झाली म्हणून एक वेळ करणे सोयीची नाही. सायंकाळी मुलाखत घेण्याचीही वेळही योग्य आहे. दिवसभराचे कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर वकिल सायंकाळी कैद्यांची मुलाखत घेऊ शकत होते. त्यामुळे या वेळेचा पुन्हा विचार होणे वकिलांच्या आणि कैद्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणारे आहे, असे येरवडा जेलमध्ये विधी सेवा प्राधिकरणातर्फे जेल को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहत असलेले अॅड. अतिश लांडगे म्हणतात.
हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले गेले. कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांचा या निमित्ताने पुन्हा आढावा घेण्यात आला. समाजाचा आरसा म्हणून वकिलांकडेही पाहिले जाते. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या वकिलांकडून जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या प्रश्नांकडे यानिमित्ताने मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले. मात्र त्यातून समोर आलेली नियमावली अडचणीची आणि जाचक होऊ नये यासाठी वकिलांकडूनच पुन्हा पुढाकार घेतला जाईल हे निश्चितच.
मुलाखत घेण्यासाठी करण्यात आलेली नियमावली
- वकील सकाळी नऊ ते साडेदहा वेळेतच कैद्यांना भेटू शकतात. वकील असल्याचे ओळखपत्रही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.
- कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी अर्ज करताना त्यासोबत बार असोसिएशनच्या ओळखपत्राची छायांकित प्रत जोडायची आहे.
- वकील भेटीचे अर्ज त्याच दिवशी सकाळी आठ ते नऊ दरम्यान मुलाखत नोंदणी कक्षात स्वीकारले जातील. त्याची नोंद कम्प्युटरवर केली जाईल. जेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणीच्या अधीन राहून वकिलांना मुलाखत कक्षात प्रवेश दिला जाईल.
- वकील भेटीसाठीची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी राहिल; तसेच रविवार आणि जेलच्या सुटीच्या दिवशी भेट बंद राहणार आहे.