देशाच्या विविध भागांत रुजलेल्या नाटक, संगीत, गायन, वादन या कलांना चालना देण्यासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे विविध प्रयत्न सुरू असतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेतर्फे देशभरात विविध महोत्सवांच्या आधारे कलेचा प्रसार आणि प्रचार केला जात आहे. कला आणि कलावंत टिकावेत, त्यांच्या कलांचे संवर्धन व्हावे, या हेतूने काम करत असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष शेखर सेन एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीतर्फे होत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांच्याशी आदित्य तानवडे यांनी संवाद साधला.
संगीत नाटक अकादमीच्या सध्या सुरू असलेल्या कार्याविषयी काय सांगाल?
- संगीत नाटक अकादमी ही अत्यंत जुनी संस्था आहे. संगीत, नृत्य, नाटक, गायन, वादन, लोककला आणि लोकसाहित्याचे जतन, विकास आणि संवर्धन हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच उद्दिष्टाने संस्थेचे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षांत ही संस्था केवळ देशातील विविध शहरांत नाही, तर ग्रामीण भागांत पोहोचावी, असा प्रयत्न केला. देशातील वेगवेगळ्या गावांत जाऊन महोत्सव आयोजित केले. तेथील कलांचे देशभरात प्रयोग सादर झाले. यातून कलांचे पुनरुज्जीवन करण्याचा एक प्रयत्न होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्वोत्तर भारत, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार अशा अनेक राज्यांतील कलांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहोत.
संस्थेकडून राबवलेल्या कलांच्या दस्तावेजीकरण प्रकल्पात तुमचा मोठा सहभाग आहे. ती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली गेली?
- मी ज्या वेळी संस्थेचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा संस्थेच्या अर्काइव्हमध्ये देशातील दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचे डॉक्युमेंटेशन फारसे उपलब्ध नव्हते. त्यानंतर हे डॉक्युमेंटेशन तयार करण्याचा निर्णय झाला आणि मग देशातील विविध कला सादर करणाऱ्या सर्व दिग्गजांचे सादरीकरण रेकॉर्ड करून ते अर्काइव्हमध्ये ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारे लोककलांचेही डॉक्युमेंटेशन तयार करण्याचे काम सुरू आहे. संस्थेकडून आयोजित केल्या जात असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे संस्थेच्या अॅपद्वारे थेट प्रक्षेपण केले जाते. देशाच्या कोपऱ्यात कुठेही कार्यक्रम सुरू असला, तरी रसिक त्याचा आस्वाद घेऊ शकतात.
लोप पावत चाललेल्या कलांसाठी संस्थेतर्फे काही वेगळे उपक्रम राबवले गेले, त्या विषयी काय सांगाल?
- आपल्याकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्याचे संवर्धन कसे करता येईल, याचा आम्ही आढावा घेतला. केरळमध्ये बाविसशे वर्षांपूर्वीची संस्कृत नाटकांची एक परंपरा आहे. 'कुडीअट्टम' या नावाने ती प्रसिद्ध आहे. ही प्राचीन कला जवळजवळ लोप पावली होती. केवळ २० कलाकार ही कला सादर करत होते. त्या संदर्भात काम आणि जनजागृती केल्यावर; तसेच या कलेला व्यासपीठ मिळवून दिल्यानंतर सादरीकरण करणारे सुमारे ८०० हून अधिक कलाकार तयार झाले. तमिळनाडूमध्ये घट्टम् हे वाद्य तयार करणारी केवळ एक महिला होती. त्या महिलेला सोबत घेऊन, इतर महिलांना घट्टम् तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. सरोद, संतूर, सनई ही वाद्ये तयार करण्याची प्रशिक्षण शिबिरे घेतली. अशा प्रकल्पांमुळे कलांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लोककलेच्या संवर्धनाविषयी नेमके कोणत्या प्रकारचे काम सुरू आहे?
- लोककला वाचली, तरच सगळ्या कला वाचतील, अशी माझी आणि संस्थेची धारणा आहे. त्या अनुषंगाने दर वर्षी देशातील विविध लोककला कलाकारांना सादर करता याव्यात, यासाठी जास्तीत जास्त महोत्सवांचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांच्या गावात जाऊन, त्यांच्या कला देशाच्या इतर भागात कशा सादर होतील, हा प्रयत्न आहे. या कला जगल्या, तर देशातील सर्व कला जगतील. येत्या काळातही या कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संस्थेच्या कार्यात आर्थिक बाबी आणि सरकारचा पाठींबा महत्त्वाचा आहे, त्या पातळीवर सरकारकडून मदत मिळते का?
- कोणत्याही संस्थेला कितीही पैसे दिले, तरी ते कमीच पडतात; पण एखाद्या संस्थेची आणि संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींची वृत्ती स्वच्छ असेल, तर मिळेल त्या निधीमध्ये काम करता येणे शक्य आहे; तरीही पैसे कमी पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत सरकारकडे दर वर्षी बजेट वाढवण्याविषयी प्रस्ताव सादर केला जातो. सरकारकडून बजेट काही प्रमाणात वाढवले जातेही. तुम्ही काम चांगले केले, तर कोणतेही सरकार पाठींबा दिल्याशिवाय राहत नाही.
गेल्या काही महिन्यांत देशात सेन्सॉरशिपवरून मोठा गदारोळ सुरू आहे. अकादमीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता?
- सेन्सॉरशिपला घाबरेल तो कलाकार कसला? कलाकार हे सरकारपेक्षा मोठे असतात. चौदाव्या शतकात कोण बादशहा होता, यापेक्षाही त्या काळात झालेले साहित्यिक, गायक, कलाकार लोकांच्या जास्त लक्षात आहेत. कलाकार हा स्वयंभू असतो. त्याने स्वत:च स्वत:ची एक सेन्सॉरशिप आखून घ्यायला हवी. ज्यांच्याकडे शक्ती आहे, ते अंकुश लावण्याचा प्रयत्न करणारच; पण तो लावून घ्यायचा की नाही, हे कलाकाराने ठरवायला हवे.