अ‍ॅपशहर

करोनामुक्तीनंतरही ४० टक्के रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त

करोनाचा संसर्ग झाल्यानंतरही भारतातील ४० टक्के बाधितांना विविध प्रकारच्या आजारांचा त्रास होत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून प्रसिद्ध झाले आहे.

Authored byमुस्तफा आतार | महाराष्ट्र टाइम्स 6 Oct 2021, 1:25 pm
पुणे : करोनाचा संसर्ग झाल्यानंतरही भारतातील ४० टक्के बाधितांना विविध प्रकारच्या आजारांचा त्रास होत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून प्रसिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after corona 40 of patients suffer from various ailments
करोनामुक्तीनंतरही ४० टक्के रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त


देशातील करोनामुक्तांना चिंता आणि नैराश्याने ग्रासले असून, त्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत आहे, तर छाती दुखणे, पोटदुखी, शारीरिक त्रास, दीर्घकालीन थकवा, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे यांसारख्या विविध दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागत आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या दुखण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निष्कर्ष यातून काढण्यात आले आहेत.

करोनासंसर्गावरील उपचारांनंतही विविध आजारांचे दुखणे कायम असल्याचेही निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिसून आले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी जगातील करोनातून बरे झालेल्या लाखो बाधितांचा सहा महिने अभ्यास केला. इन्स्टिट्यूटने भारतासह जगातील दोन लाख ७३ हजार ६१८ रुग्णांचा अभ्यास केला आहे. अमेरिकेतील 'त्रिनेक्स' या इलेक्ट्रॉनिक डेटा सर्व्हरवरून जगातील कोव्हिड -१९ रुग्णांची माहिती घेऊन त्यावरून हे निष्कर्ष काढले आहेत. या अहवालात शास्त्रज्ञांनी भारतातसुद्धा जवळपास करोनामुक्तीनंतर सुमारे ४० टक्के नागरिकांना त्रास होत आहे किंवा झाला आहे, असे प्रमुख निरीक्षण मांडले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी करोनातून बरे झालेल्या रुग्णांना सध्या जाणवत असलेल्या नऊ दुष्परिणामांची यादी केली आहे. त्यात चिंता आणि नैराश्य या दोन दुष्परिणामांनी १५ टक्के रुग्णांना ग्रासले आहे. ३७ टक्के रुग्णांना इतर प्रकारचे त्रास होत आहेत. त्यात थकवा, सांधेदुखी, वारंवार छातीत दुखणे, खोकला, डोळे लाल होणे, डोकेदुखी, घसा कोरडा होणे, भूक न लागणे, घसा खवखवणे, चक्कर येणे, अतिसार या प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत.

स्त्रियांना डोकेदुखी जास्त

कोव्हिड रुग्णांचे वय, लिंग, त्यांना संसर्गाची झालेली तीव्रता याचाही मोठा परिणाम या लक्षणावरून दिसून आला. उपचारासाठी रुग्णालयात राहिलेल्या रुग्णांमध्ये कोव्हिडच्या विषाणूंची लक्षणे दीर्घकाळापर्यंत दिसून आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह पुरुषांना श्वासोच्छवासाच्या आणि शारीरिक समस्या अधिक होत्या. तरुण आणि स्त्रियांना डोकेदुखी, ओटीपोटात लक्षणे आणि चिंता जास्त असून, नैराश्याने ग्रासल्याचे आढळून आले.

'कोव्हिड-१९'मधून बरे झालेल्या अनेक रुग्णांवर विविध आजारांच्या स्वरूपात त्याचे दीर्घ काळ परिणाम राहात असल्याचे दिसून आले आहे. कोव्हिडनंतरही इतर आजार काही आठवडे ते महिन्यांपर्यंत राहू शकतात. भारतात कोव्हिडमधून पूर्ण बऱ्या झालेल्या ४० टक्के नागरिकांना त्रास जाणवत आहे.

- डॉ. नानासाहेब थोरात,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, मेडिकल सायन्स डिव्हिजन,

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज