अ‍ॅपशहर

कृषीसेवक परीक्षेत गैरप्रकार?

राज्यात गेल्या आठवड्यात ९०३ पदांसाठी पार पडलेली कृषी सेवक परीक्षा बोगस पद्धतीने पार पडली असून परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षेसाठी आधार कार्ड, हॉल तिकीट, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक अशा कोणत्याच पद्धतीचा वापर करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

Harsh Dudhe | Maharashtra Times 19 Mar 2018, 2:54 pm
पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात ९०३ पदांसाठी पार पडलेली कृषी सेवक परीक्षा बोगस पद्धतीने पार पडली असून परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षेसाठी आधार कार्ड, हॉल तिकीट, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक अशा कोणत्याच पद्धतीचा वापर करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. तर, एकाच परीक्षेसाठी उमेदवारांनी एकापेक्षा अधिक केंद्राहून अर्ज करून दोन ते तीन वेळा परीक्षा दिली आहे. त्यामुळे या परीक्षेत डमी रॅकेट किंवा बोगस पद्धतीने पदभरती करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. परीक्षेतील गैरप्रकार पुढे आल्याने उमेदवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agricultural service test for malpractices
कृषीसेवक परीक्षेत गैरप्रकार?


कृषी विभागाच्या ९०३ कृषी सेवक पदासाठी राज्य सरकारच्या महापरीक्षा पोर्टलद्वारे राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये १३ ते १५ मार्च रोजी विविध केंद्रांवर नऊ शिफ्टमध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला साधारण एक लाख विद्यार्थी बसले असण्याची शक्यता आहे. ही परीक्षा इतर परीक्षांच्या नियमावलीनुसार होणे अपेक्षित असताना कोणत्याच प्रकारचे नियम पाळण्यात आले नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. या एका परीक्षेसाठी काही उमेदवारांनी अनेक लॉगइन आयडी तयार करून एकापेक्षा अधिक अर्ज केले. त्यामुळे एकाच उमेदवाराला विविध ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी दोन ते तीन हॉल तिकीट देण्यात आले. या संधीचा उमेदवारांनी वापर करून एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. याला 'महापरीक्षा पोर्टल'ने सूचनेद्वारे दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे डमी उमेदवारांना परीक्षा देण्याची पुरेपूर संधी होती आणि या उमेदवारांनी त्याचा फायदा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षा केंद्रांवर बोगस ऑफलाइन पद्धतीने बायोमेट्रिक हजेरी घेऊन उमेदवारांच्या अंगठ्यांच्या ठशांचे केवळ स्कॅनिंग व छायाचित्र घेण्यात आले. नियमांना डावलून परीक्षा हॉलमध्ये उमेदवारांना कोणत्याही कम्प्युटरवर बसण्याची मुभा देण्यात आली होती. याचा फायदा उमेदवारांनी घेऊन चर्चा करीत पेपर सोडविले आहेत. परीक्षा देणाऱ्या कोणत्याच उमेदवारांचे हॉल तिकीट सही करून कर्मचाऱ्यांनी जमा केले नाही. तर, अनेक परीक्षा केंद्रांवर उमेदवारांकडे हॉल तिकीट नसताना किंवा हॉल तिकिटावर उमेदवाराचे छायाचित्र नसलेल्यांनीदेखील परीक्षा दिली आहे. दरम्यान, विविध शिफ्टमध्ये पार पडलेल्या पेपरची काठीण्यपातळीदेखील वेगळी होती. त्यामुळे परीक्षेच्या पेपरमध्ये समतोल राखला गेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही परीक्षा तातडीने रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात यावी किंवा एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा देणाऱ्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी काही उमेदवारांनी केली आहे. तसेच, संपूर्ण प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक माहितीसाठी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

भाषांतर अर्थहीन?

'महापरीक्षा पोर्टल'ने पेपरमधील इंग्रजी भाषेतील प्रश्नांचे भाषांतर गुगल ट्रान्सलेटरच्या साह्याने करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांचा अर्थच लागला नाही. त्यामुळे परीक्षेतील प्रश्न उमेदवारांना समजले नाही. अशातच पेपरमध्ये अनेक टायपिंग चुका झाल्या आहेत, असे काही उमेदवारांनी सांगितले.

राज्यात महापरीक्षा पोर्टलद्वारे कृषी सेवक परीक्षा बोगस पद्धतीने घेण्यात आली आहे. आयबीपीएस, रेल्वे भरती, एसएससीच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षा झालेली नाही. परीक्षा ज्या पद्धतीने पार पडली, त्यामध्ये डमी परीक्षार्थ्यांचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी.

- दत्ता वानखेडे, तक्रारदार
लेखकाबद्दल
Harsh Dudhe

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज