अ‍ॅपशहर

विमान सेवेची ‘आंधळी कोशिंबीर’

लोहगाव विमानतळावरून रात्रीची उड्डाणे बंद झालेली असतानाही, ट्रॅव्हल बुकिंगसाठी बहुतांश वेबसाइटवर अद्याप रात्रीची उड्डाणे दिसत आहेत. त्यानुसार प्रवाशांनी रात्रीची तिकिटे बुक केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासावेळी मात्र त्यांना दिवसाच्या उड्डाणांचा पर्याय दिला जात आहे.

Authored byकुलदीप जाधव | महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2020, 8:31 am
पुणे: लोहगाव विमानतळावरून रात्रीची उड्डाणे बंद झालेली असतानाही, ट्रॅव्हल बुकिंगसाठी बहुतांश वेबसाइटवर अद्याप रात्रीची उड्डाणे दिसत आहेत. त्यानुसार प्रवाशांनी रात्रीची तिकिटे बुक केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासावेळी मात्र त्यांना दिवसाच्या उड्डाणांचा पर्याय दिला जात आहे. यामध्ये प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून, एखाद्याने तिकीट रद्द करून नवीन तिकीट काढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम विमान सेवेची ‘आंधळी कोशिंबीर’


धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे लोहगाव विमानतळाहून होणारी रात्रीची विमान सेवा येत्या वर्षभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने २५ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या हिवाळी वेळापत्रकातदेखील त्याची नोंद केली आहे. वेळापत्रकानुसार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सोमवार ते शुक्रवार ७६ आणि शनिवारी-रविवारी ६० उड्डाणे (ये-जा) होणार आहेत. वेळापत्रकानुसार उपलब्ध असलेले 'स्लॉट' विमान कंपन्यांना काही महिने आधीच कळविले जातात. त्यानुसार कंपन्या उड्डाणांचे नियोजन करतात. त्यामुळे रात्रीची उड्डाणे बंद झाल्याचे माहिती असूनही कंपन्या रात्रीच्या उड्डाणांची तिकिटे विकत आहेत. विमानाच्या तिकिटासाठी अनेक ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइटदेखील आहेत. या वेबसाइटवर एक जानेवारीला पुणे-जयपूर आणि पुणे-हैदराबाद या प्रवासासाठी उपलब्ध विमाने तपासली असता, त्यामध्ये रात्री ११ वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंतची अनेक उड्डाणे दाखवली आहेत. पुण्यातून सेवा देणाऱ्या अपवाद वगळता सर्वच कंपन्यांची रात्रीची उड्डाणे यात दिसत आहेत. एवढेच नाही, तर ती तिकिटेदेखील बुक होत आहेत.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळातील रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाचे पैसे अद्यापही काही नागरिकांना मिळालेले नाहीत. विशेषत: एजंटमार्फत केलेल्या बुकिंगचे पैसे अडकलेले आहेत. अशा स्थितीत आता नव्याने दुसरा आर्थिक फटका बसत आहे. एजंटमार्फत तिकिट बुक केलेल्यांचे पैसे विमान कंपनीकडे अडकल्याचे प्रकार घडले आहेत. तर, वैयक्तिक तिकीट बुक करणाऱ्यांना तिकीट रद्द केल्यानंतर 'सर्व्हिस चार्ज'चा भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

तिकीट बुकिंगवर कोणाचे नियंत्रण?

लोहगाव विमानतळावरून रात्रीची उड्डाणे बंद होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने विमान कंपन्यांना यापूर्वीच दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी २६ ऑक्टोबरनंतर रात्रीचे तिकीट बुकिंग सुरू ठेवले. त्यानुसार अनेकांनी रात्रीची तिकिटे बुक केली असून, आता त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने जाहीर केल्यानंतरही विमान कंपन्या रात्रीच्या तिकिटांची विक्री का करत होत्या, त्यांच्या तिकीटविक्रीवर विमानतळ प्रशासन किंवा 'डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'चे (डीजीसीए) नियंत्रण नाही का, असे प्रश्न उपस्थित होतात.

''लोहगाव विमानतळावरून होणारी रात्रीची उड्डाणे बंद होणार आहेत, ही बाब विमानतळ प्रशासनाकडून विमान कंपन्यांना गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातच कळविण्यात आली होती.'' - कुलदीप सिंग, विमानतळ संचालक, लोहगाव
लेखकाबद्दल
कुलदीप जाधव
कुलदीप जाधव हे महाराष्ट्र टाइम्समध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत आहे. ते गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. ते क्राइम, वाहतूक, बाजार समिती, जिल्हा परिषद, समाज कल्याण या विषयांसह विविध विषयांचे वार्तांकन करीत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज