भवानीनगर : 'राज्य सरकारचे महिनाभरात घेतलेले सर्व निर्णय घटनाबाह्य असून, आत्ताचे सरकार देवाच्या भरवशावर सुरू आहे. या सरकारने एका महिन्यात कुठलेही निर्णय घेतले नाहीत,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
बावडा (ता. इंदापूर) येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. 'सात जणांवर हे सरकार चालू आहे. अजूनही खातेवाटप झाले नाही. त्यांची भांडणे त्यांना लखलाभ होवोत. मात्र, या भांडणात मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला हे मला आत्ताच माहिती झाले. हे अजूनही सुरू राहील,' असे पाटील म्हणाले. महाविकास आघाडीच्या कर्जमाफीवरही त्यांनी टीका केली.
'तुम्ही महाराजांची भाषा बोला'
चंद्रकांत पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या टीकेस प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, 'डॉ. अमोल कोल्हे आत्ताच शिवसेनेतून 'राष्ट्रवादी'त आले आहेत. ते मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांप्रमाणेच वागावे. बोलताना संभाजी महाराजांची भाषा वापरावी. पवारांना बरे वाटेल, अशी भाषा वापरू नये. आम्हाला पोटशूळ उठण्याचे काही कारणच नाही. आम्हाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यानुसार आम्ही टीका केली.'